कोरोनाचे थैमान असणाऱया यूएई-दमाम येथे जाणून आणले भारतीय नागरिकांना
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना विषाणूच्या संकटकाळात अनेक लोक वेगवेगळय़ा प्रकारची सेवा देत देशसेवा करीत आहेत. त्यात भर पडली आहे ती कुडाळ तालुक्यातील निरुखे येथील कॅप्टन आदित्य अरुण पवार या सिंधुदुर्गच्या वैमानिक सुपुत्राची. लॉकडाऊन काळात परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना एअर इंडियाची विमाने पाठविली जात आहेत. त्यात 20 मे रोजी यूएई-दमाम येथे संकटकाळातही जाऊन 200 नागरिकांना देशसेवेसाठी उड्डाण घेतलेल्या आदित्यने देशाचे नाव उंचीवर नेले आहे. आपल्या कर्तृत्वाने निरुखे गावाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे नावही साता समुद्रापार नेले आहे.
संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आले आणि खबरदारी म्हणून प्रत्येक देशाने प्रथम आपली विमान सेवा ब्ंाद केली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे आपल्या देशात आलेले परदेशी नागरिक भारतातच अडकून पडले. कोरोनाची सतत वाढत असणारी व्याप्ती पाहता आपल्या देशातही लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला. त्यामुळे भारतात आलेल्या परदेशी नागरिकांसमोर पुन्हा त्यांच्या देशात जाण्याबाबत प्रश्न निर्माण झाला. त्यांना त्यांच्या देशात जाण्याबाबत प्रश्न निर्माण झाला. त्यांना त्यांच्या देशात सोडण्यासाठी आपल्या प्रशासनाने तयारी दाखवून त्याप्रमाणे परदेशी नागरिकाना एअर इंडियाच्या विमानाने सोडले. त्याचप्रमाणे आता परदेशात अडकलेल्या सुमारे 32 हजार भारतीय नागरिकांनाही आणण्याचा निर्णय शासनाने घेतला व ज्या-ज्या देशात भारतीय नागरिक अडकले आहेत, त्यांना विमानाने आणण्याचे काम सुरु केले आहे. परदेशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणत असताना ज्या देशात कोरोनाचे थैमान आहे, त्या देशातून भारतीय नागरिकांना आणणे सोपे नाही. जिगरबाज वैमानिकांकडूनच अशी कामगिरी घेऊ शकते. सिंधुदुर्गचा सुपुत्र असलेल्या निरुखे येथील आदित्य अरुण पवार या वैमानिकाने ही जबाबदारी स्वीकारत यशस्वीपणे पार पाडली.
परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान हैद्राबाद येथून यूएई-दमाम येथे पाठविले गेले. या विमानामध्ये एकूण चार वैमानिक होते. त्यामध्ये आदित्याचा समावेश होता. यूएई-दमामहून 200 नागरिकांना हैद्राबाद येथे आणण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात धैर्याने तोंड देऊन परदेशातून नागरिकांना घेऊन येण्याचा क्षण अभिमानास्पद होता. यूएई-दमामहून हैद्राबादमध्ये पोहोचल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता. वैमानिकांचेही त्यांनी आभार व्यक्त केले, आदित्य सांगत होता. 20 मे रोजी यूएई-दमाम येथून विमानाने प्रवाशांना आणल्यानंतर आदित्याला हैद्राबाद विमानतळावरच 14 दिवस क्वारंटाईन करून ठेवण्यात आले.
मिळालेली संधी प्रेरणादायी – आदित्य
सध्या मुंबईतील कांदिवली येथे राहणारा कुडाळ तालुक्यातील निरुखे गावचा सुपुत्र असलेल्या आदित्यची आई मिनल व वडील अरुण पवार मुंबई बँकेत नोकरीला. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने आदित्याची वैमानिक होण्याची इच्छा पूर्ण होणार का, याबाबत साशंकता होती. तरीही मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आदित्याच्या आई-वडिलांनी कर्ज काढून त्याला वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. तेथे वैमानिकाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तो भारतात परतला. त्यानंतर गेली दोन वर्षे तो एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून यशस्वीपणे सेवा बजावत आहे. कोरोनाच्या संकटकाळात धैर्याने विमानोड्डाण करण्यासाठी मिळालेली संधी ही खूपच प्रेरणादायी ठरली, असे आदित्य म्हणाला.