काही शाळांचे वर्ग बंद तर काहींचे चालू : शिक्षण खात्याचा आदेश अद्याप नाही
प्रतिनिधी /पणजी
कोविडची तिसरी लाट निपटून काढण्यासाठी स्थापन केलेल्या कृती दलाने दि. 26 जानेवारीपर्यंत राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद करण्याची शिफारस राज्य सरकारला केली असली तरी राज्य सरकारने शिक्षण खात्याला कोणतीही सूचना केलेली नाही. शिक्षण खात्याने अद्याप आदेश जारी केलेला नाही. परिणामी काही शाळांनी शिकवणीचे वर्ग चालू ठेवले आहेत तर काही पालकांनी केलेल्या विनंतीनुसार काही शाळांनी वर्ग बंद केले आहेत. या प्रकारामुळे अक्षरशः गोंधळ उडालेला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जरी दि. 7 रोजी निर्णय घेतला जाईल, असे सांगितले असले तरी त्याच दरम्यान निवडणुका घोषित होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सरकारचा निर्णय हा राजकीय ठरू शकतो.
राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये सरकारचा योग्य आदेश नसल्याने गोंधळ उडालेला आहे. कोविडच्या तिसऱया लाटेने गोव्यात दिवसेंदिवस कोविड बाधितांचे प्रमाण वाढत आहे. मात्र या लाटेत पूर्वीसारखी तिव्रता नसणार, असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी गृहित धरले असले तरी कित्येक पालक हे आपल्या मुलांना शिक्षण संस्थेत पाठविण्यास राजी नाहीत. काही शिक्षण संस्थांचे अधिकारी अत्यंत हेकेखोर असून त्यांनी पालकांचे न ऐकता शाळा चालूच रहाणार असे सांगितले आहे, वर्गही चालूच ठेवले आहेत.
तिसऱया लाटेने सध्या गोव्यात आक्रमक स्वरुप धारण केलेले आहे. दिवसाकाठी 520 ते 600 जण बाधित सापडत आहेत. दोन दिवसांपूर्वी कृती दलाची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत दि. 26 जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था अर्थात राज्यातील वर्ग बंद ठेवावेत. इयत्ता 12 पर्यंतचे वर्ग बंद ठेवावेत. परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात याव्यात, अशी सूचना केली आहे. तसेच इतर राज्यांप्रमाणेच नाईट कर्फ्यू लागू करण्यात यावा, अशी सूचना केली आहे.
सरकारी आदेशानंतरच शिक्षण संस्थांना सूचना : सावईकर
तथापि, या संदर्भातील सरकारी आदेश जारी झालेला नाही. सरकारकडून शिक्षण खात्याला कोणत्याही सूचना गेलेल्या नाहीत. शिक्षण संचालक भूषण सावईकर यांना विचारले असता आपल्याला परिस्थितीची कल्पना आहे. सरकारकडून आदेश जारी झाल्यानंतर आम्ही सर्व शिक्षण संस्थांना त्वरित सूचना करणार आहोत. तथापि, सध्या सर्व शिक्षण संस्थांना कोविडसंदर्भात सर्व तऱहेची काळजी घ्या, अशी सूचना केलेली आहे. शक्य होईल त्यांनी परीक्षा पुढे ढकलाव्यात असेही कळविलेले आहे.
पालक, विद्यार्थ्यांसमोर गंभीर समस्या
सरकारने कोणताही आदेश जारी झालेला नसल्याने शिक्षक, पालक यांच्या दरम्यान गोंधळ उडालेला आहे. काही शिक्षण संस्थांनी स्वतःहून वर्ग बंद ठेवलेले आहेत. अनेक भागातील सरकारी शाळांध्ये मुले गेली नाहीत. खासगी परंतु सरकारी अनुदानावर चालणाऱया शाळांतील काही व्यवस्थापनांनी शाळा बंद करणार नाही, असे ठरविल्याने विद्यार्थी व पालकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
सात तारीखपर्यत वाट पहा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दि. 7 जानेवारी रोजी कृती दलाची एक महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तथापि, निवडणूक आयोग दि. 7 रोजीच निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे. एकदा आचारसंहिता सुरु झाल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा राजकीयदृष्टय़ा प्रभावशिल ठरतो. त्यातूनही गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. दि. 7 जानेवारीपर्यंत शिक्षण क्षेत्रातील हा गोंधळ चालूच रहाणार आहे.