ऑस्ट्रेलियातील मालिकाविजय : नामोल्लेख टाळत अजिंक्य रहाणेची शास्त्रींवर जोरदार टीका
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱयातील ऍडलेड कसोटी सामन्यात अवघ्या 36 धावांमध्ये धुव्वा उडाल्यानंतर अजिंक्य रहाणेने संघाची फेररचना करत रणनीती, आडाखे बदलले आणि भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चारीमुंडय़ा चीत केले. पण, त्यावेळी निर्णय माझे असले तरी श्रेय मात्र इतरांनीच लाटले असल्याची जहरी टीका रहाणेने गुरुवारी केली.
नियमित कर्णधार विराट कोहली ऍडलेडमध्ये संपन्न झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील नामुष्कीजनक पराभवानंतर कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला आणि अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची सूत्रे सोपवण्यात आली. रहाणेने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा तब्बल 8 गडय़ांनी फडशा पाडण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने स्वतः तडफदार शतकही झळकावले. मात्र, आपल्या निर्णयाचे इतरांनी श्रेय लाटल्याची सल त्याने येथे व्यक्त केली.
‘त्या कसोटीत माझे योगदान काय होते, त्याची मला कल्पना आहे. ते मी सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही. त्यातील काही निर्णय मी स्वतः मैदानावर किंवा ड्रेसिंगरुममध्ये घेतले होते. पण, आणखी कोणी तरी त्याचे श्रेय घेतले’, असे रहाणे म्हणाला. रहाणेने याप्रसंगी कोणाचाही स्पष्ट उल्लेख केला नाही. मात्र, त्याचा रोख तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे असल्याचे मानले जाते. भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिकाविजय नोंदवला, त्यावेळी त्याचे पूर्ण श्रेय आपल्याला मिळाले नाही, असा रहाणेचा दावा आहे.
‘त्या मालिकेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काहींनी हा निर्णय माझा होता, तो निर्णय माझा होता, असे जाहीरपणे सांगत बेधडक श्रेय लाटले. आता व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून मी माझ्या निर्णयाची माहिती देत गेलो. पण, त्याचा असा लाभ घेतला जाणे अनपेक्षित होते’, असे रहाणे याप्रसंगी म्हणाला. मागील वर्षी रहाणेने 13 कसोटी सामने खेळत त्यात 20.82 च्या किरकोळ सरासरीसह अवघ्या 479 धावा जमवल्या. त्याने दोनवेळा महत्त्वाची अर्धशतके व काही वेळा 40 च्या घरात धावा केल्या. मात्र, त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. त्याची फटक्यांची निवड देखील सातत्याने टीकेच्या केंद्रस्थानी राहिली.
दक्षिण आफ्रिकेतही त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. त्याला 6 डावात 22.67 च्या सरासरीने जेमतेम 136 धावा जमवता आल्या. पण, यानंतरही होणारी टीका व्यथित करणारी नाही, असे तो मानतो.