पालकमंत्री बाळासाहेब पाटील
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ात दुसऱया लाटेचा आवेग ओसरत असल्याने राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हय़ात लॉकडाऊन शिथील करण्यात आलेला आहे. बाधित वाढीचा वेग मंदावत असताना गेल्या दोन चार दिवसात पुन्हा पॉझिटिव्हीटचा दर वाढत चालला असल्याने नागरिकांनी नियम पाळण्याची नितांत आवश्यकता आहे. कोरोना संसर्ग वाढल्यास निर्बंध वाढवावे लागतील. त्यापेक्षा नागरिकांनी नियम पाळून संसर्ग रोखावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
जिल्हय़ाला दुसऱया लाटेचा तडाखा चांगलाच बसला आहे. त्यातून सर्वांच्या सहकार्याने आपण सावरत आहोत. बाधित वाढीचा वेग कमी आल्याने लोकांना दैनंदिन जीवन जगताना अडचणी येवू नयेत म्हणून लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे. मात्र, बाजारपेठांमध्ये नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी मास्क, हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर या नियमांचे पालन केल्यास संसर्गाचा धोका कमी होवू शकतो. त्यामुळे अद्यापही काही महिने तरी नियम पाळणे गरजेचे असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
काही ठिकाणी नागरिक नेमके बोलताना तोंडावरील मास्क काढून बोलत आहेत, ही बाब अत्यंत चुकीची आहे. आपण सर्वजण एका संकटाला तोंड देत पुढे जात असताना कोरोना संसर्ग वाढूच नये यासाठी सर्वांनीच नियम पाळून कोरोनाविरुध्दच्या लढय़ात सहभाग नोंदवला पाहिजे. जर पुन्हा पॉझिटिव्हिटीचा आलेख वाढू लागला तर मग प्रशासनाला निर्बंध पुन्हा जारी करावे लागतील. नागरिकांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये, बाहेर पडल्यास मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या बाबी कटाक्षाने पाळाव्यात, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.
खरीप हंगाम सुरु असल्याने कृषी केंद्रे, दुकानांसह सर्वच दुकाने सुरु आहे. दुकांनांमध्ये देखील सुरक्षित अंतर व नियम पाळून व्यवहार करावेत. ज्यामुळे जिल्हय़ात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.