देशात सलग दुसऱया दिवशी 16 हजारांवर रुग्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या 24 तासांत देशभरात 16 हजार 577 नवे बाधित सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दुसरी लाट अधिक तीव्र आणि अधिक वेगाने पसरू शकते, असा अंदाज वैद्यकीय तज्ञ व्यक्त करत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने यापूर्वी लागू केलेले कोरोना निर्बंधित क्षेत्रातील नियम 31 मार्चपर्यंत कडकपणे राबविण्याचे निर्देश शुक्रवारी जारी केले. या निर्देशांमुळे कंटेनमेंट क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासांमधील आकडेवारी पाहता देशात कोरोनामुळे 120 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 56 हजार 825 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये नव्या बाधितांचा आकडा वाढलेला दिसून येत आहे.
देशात शुक्रवारी 16 हजार 577 नवे बाधित सापडले असून आतापर्यंतच्या रुग्णांचा एकंदर आकडा 1 कोटी 10 लाख 63 हजार 491 झाला आहे. अजूनही देशात 1 लाख 55 हजार 986 सक्रिय रुग्ण असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तसेच 1 कोटी 7 लाख 50 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलियन स्ट्रेन-कोविडचे नवीन आणि अत्यंत संसर्गजन्य स्ट्रेन भारतात वाढत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. नवीन नियम हे ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वमधील प्रवासी वगळता इतर भागातून येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू असतील. ब्रिटन, युरोप आणि मध्य-पूर्वेमधून प्रवास करणाऱया प्रवाशांना देशात आल्यावर स्वतःच्या खर्चाने आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य
करण्यात आले आहे.