पोलिसांकडून 19 जणांवर कारवाई : धबधबे पूर्ण प्रवाही
वार्ताहर / आंबोली:
आंबोलीत पर्यटनाला बंदी असूनही रविवारी पर्यटकांची पावले मुख्य धबधब्याकडे वळली. मात्र, पोलिसांनीही पर्यटकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. दिवसभरात 19 जणांवर दंडात्मक कारवाई केल्याचे हवालदार दत्तात्रय देसाई यांनी सांगितले. अधिकतर पर्यटक जिल्हय़ातीलच होते.
आंबोलीत पावसाळी पर्यटन अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, गेली दोन वर्षे दरडी, कोरोना यामुळे पर्यटन बहरलेच नाही. यंदाही कोरोनामुळे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे धबधबे प्रवाही होऊनही पर्यटकांना बंदी आहे. अशा स्थितीतही काहीजण पर्यटनासाठी आंबोलीत येत आहेत.
आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी सर्व वाहने थांबवून कडक तपासणी केली जाते. कोरोना अहवाल असल्याशिवाय कोणालाही जिल्हय़ात प्रवेश दिला जात नाही. सावंतवाडी, गोवा येथे जाणाऱया प्रवाशांची तपासणी करून त्यांना खाली पाठविले जाते. नंतर तेच प्रवासी मुख्य धबधबा तसेच अन्य ठिकाणी थांबून पर्यटनाचा आनंद लुटताना दिसतात. त्यात जिल्हय़ातील पर्यटकांची संख्या अधिक आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बेळगाव तसेच कोल्हापूर जिल्हय़ातून पर्यटक आंबोलीत आले होते. मात्र, त्यांना पोलिसांनी चेकपोस्टवरून माघारी पाठविले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या नेतृत्वाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दत्तात्रय देसाई यांनी सर्व पॉईंटवर जाऊन पाहणी करत तेथील पर्यटकांना माघारी पाठविले. तर बेधुंद पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. आंबोलीतील पर्यटन स्थळे तसेच गेळे येथील कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद असल्याने तेथे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
रविवारी सकाळपासूनच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या
नेतृत्वाखाली हवालदार दत्तात्रय देसाई, पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते, सहाय्यक उपनिरीक्षक बाबू तेली, हवालदार सुनील भोगण, कॉन्स्टेबल अभिजीत कांबळे, कॉन्स्टेबल राजेश नाईक, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस नाईक मयुर सावंत तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड यांनी ही कारवाई केली.