हाथरस, लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील हाथरस अत्याचार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तसेच आता पीडितेच्या कुटुंबीयांनी आम्हाला धमकाविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. घरातील पुरुषांना मारहाण झाली असून तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच काही अधिकाऱयांकडून पैशांचे आमिषही दाखविण्यात आल्याचा दावा पीडित मुलीच्या काकीने केल्याने वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. दरम्यान, या तप्त वातावरणातच राहुल आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी रात्री पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवर देशभरात संतापाचे वातावरण असताना पोलिसांकडून विरोधी पक्षातील नेते आणि माध्यमांची होणारी अडवणूक यामुळे उदेक वाढताना दिसत आहे. हाथरसमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने गावाला छावणीचे स्वरुप दिले असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. तब्बल 300 पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी पीडित तरुणीच्या गावात सात पोलीस वाहने आणि पाच बॅरिकेट्सही उभे करण्यात आले होते. मात्र टीकेची झोड उठल्यानंतर योगी सरकारने माध्यमांना परवानगी दिल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी योगी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला आहे. प्रशासनाकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच आम्हाला कुणाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नये, अशी तंबी देखील दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. त्याचप्रमाणे गावातल्या काही जणांची भीती वाटत आहे. गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील, असा खळबळजनक आरोपही पीडित कुटुंबाने केला आहे.
सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी
सर्व गावाची पोलिसांनी नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर माध्यमांना गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. पोलिसांनी ज्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हतीच असा दावा पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने एसआयटीचे गठण केले असून ते तपास करत आहेत. मात्र एसआयटीच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.
मुख्य आरोपीला अटक
उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी लवकुश याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्यावेळी पीडिता तिच्या शेतात जखमी अवस्थेत आढळून आली, त्यावेळी आरोपी लवकुश हा शेतात त्याच्या आईसोबत काम करत असल्याचे आरोपीच्या आईचे म्हणणे आहे. तर हाथरस प्रकरणातील दुसऱया आरोपीच्या आईनेही आपली बाजू मांडताना आपला मुलगा सकाळी 7 वाजता डेअरीवर कामाला गेला आणि दुपारीच परत आल्याचे सांगितले. पीडित कुटुंब वारंवार आपले जबाब बदलत असल्याचा आरोपही तिने केला आहे. आरोपीच्या आईने आपला मुलगा निर्दोष असल्याचे म्हटले आहे.