जाचक लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत रत्नागिरी निर्भिड व्यापारी महासंघ बुधवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला. जिल्हय़ातील सर्वसामान्य नागरिक व व्यापारी बांधवांसाठी जाचक लॉकडाऊन मागे घेण्यासाठी प्राण गेले तरी चालतील पण आमरण उपोषणाचा निर्धार केल्याचे या महासंघातर्फे सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून जिल्हाभर बाजारपेठांत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबाबत निर्भिड व्यापारी महासंघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यासाठी हा महासंघ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यासाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले आहे. जिल्हय़ातील सर्वसामान्य नागरिकांसाठी व व्यापारी बांधवांसाठी लॉकडाऊन मागे घेत नाही, तोपर्यंत प्राणांतिक आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 7 ते साय्ंांकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन शिथील करून ते करावा. आणि शुक्रवारी सायंकाळी 5 ते सोमवार सकाळी 7 हा कडक लॉकडाऊन करावा. यामुळे नागरिकांसह व्यापारीवर्गालाही दिलासा मिळेल, अशी मागणी निर्भिड व्यापारी महासंघ, रत्नागिरी यांच्यावतीने करण्यात आली आहे. हे निवेदन देवेंद्र उर्फ बंटी वणजू, भैय्या मलुष्टे, नीलेश भोसले, राजू भाटलेकर, सुनील मलुष्टे, अजय गांधी, सुदेश मलुष्टे, मुकुंद मलुष्टे, अस्लम मेनन आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.