मुंबई / ऑनलाईन टीम
अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अवघ्या काही तासात मागे घेतला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा आदेश चुकून निघाल्याचे सांगत व्याजदर जैसे थे राहतील असे स्पष्ट केले आहे. मात्र यावरून आता काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबतच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील निर्मला सीतारमण यांच्या ट्वीटवर निशाणा साधला आहे.
अशोक चव्हाण यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, नजरचूक वगैरे काही नाही! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेण्यात आला असावा. परंतु, आज १ एप्रिल आहे. हे #AprilFools पण असू शकतं. निवडणूक संपल्यावर कदाचित आज मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखीस सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की,. वित्त मंत्रालयाच्या नजरचुकीचे अजिबात नवल वाटले नाही. पण वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतय? आणि या मंत्रालयाने शेवटचा कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता? नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी की कोरोना संदर्भातील आर्थिक पॅकेज? असा सवाल केला आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आल्याची घोषणा बुधवारी रात्री करण्यात आली होती. परंतु गुरुवारी सकाळी हा निर्णय मागे घेण्याची अधिकृत घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. त्यामुळे व्याजदर हे जैसे थे राहतील.