प्रतिनिधी/मुंबई
कोरोना काळात मनोरंजनसृष्टीला चित्रीकरणासाठी काही नियमांसह राज्य सरकारने परवानगी दिली. पण चित्रीकरणाच्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने भरारी पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मनोरंजनसृष्टी ठप्प होती. या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचा रोजगार चालू होऊन उपासमार थांबावी म्हणून शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली. परंतु चालू झालेल्या शूटिंगच्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कोरोनासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही हे चित्रपट महामंडळाच्या लक्षात आले. चित्रपट, मालिका, वेबसीरीज, जाहिरात, अल्बम, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म अशा प्रकारच्या शूटिंगसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. शूटींग परवानगीशिवाय कोणीही शूटींग करू नये असा इशारा महामंडळाने दिला आहे. सेटवरील लहान मुले आणि ज्येष्ठ कलावंतांची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यांच्या बाबतीत हयगय झाली तर न्यायालयाही त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकेल अशी शक्यताही महामंडळाने व्यक्त केली आहे. चित्रपट महामंडळ सर्व चित्रीकरणांवर बारकाईने लक्ष ठेवणार असून सेटवर जाऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमावलीचे पालन केले जाते की नाही हे पाहिले जाणार आहे.