कपिलेश्वर तलावाचे पावित्र्य धोक्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर तलाव येथील निर्माल्यकुंड फुल्ल झाले असून निर्माल्याची उचल न झाल्याने निर्माल्य इतरत्र पसरले आहे. नागरिकांकडून कपिलेश्वर तलावात निर्माल्य टाकण्यात येत असून यामुळे निर्माल्याचे पावित्र्य व तलावाची स्वच्छता धोक्यात आली आहे. निर्माल्य कुंडातच टाकण्यात यावे यासाठी मनपातर्फे तलावाच्या बाजूला कुंडाची व्यवस्था केली आहे. मात्र सदर कुंड भरल्यामुळे नागरिकांकडून कुंडाच्या बाहेर निर्माल्य टाकण्यात येत आहे. परिणामी निर्माल्य कुंडाला कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी तसेच निर्माल्याचे पावित्र्य राखले जावे व तलावात निर्माल्य टाकू नये यासाठी निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून त्याचा योग्य वापर होत नसून निर्माल्य कुंडात कचरा टाकण्याबरोबरच निर्माल्य कुंडात निर्माल्य न टाकता बाहेरच टाकून जाणे असे प्रकार करण्यात येतात. यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा गैरवापर नागरिकांकडूनच केला जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.
उचल वेळेत होणे गरजेचे
कपिलेश्वर मंदिर परिसरातच सदर निर्माल्य कुंड आहे. यामुळे मंदिराला येणाऱया भक्तांची संख्या अधिक आहे. यामुळे अनेक ठिकाणहून निर्माल्य कुंडात टाकण्यासाठी भक्तमंडळी या कुंडाचा लाभ घेतात. मात्र प्रत्यक्षात मनपाकडून वेळेत उचल न झाल्याने त्यामध्ये भर पडत असून निर्माल्य कुंडातील निर्माल्य कुजून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे वेळेत उचल करून त्याचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी मनपाची असल्याचे मत व्यक्त होत आहे.