नीति आयोगाकडून निर्देशांक जाहीर : महाराष्ट्र दुसऱयास्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नीति आयोगाने राज्याच्या निर्यातविषयक तयारीसंबंधी ‘एक्स्पोर्ट प्रिपेयर्डनेस इंडेक्स’ तयार केला आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निर्यातविषयक प्रणालींचा आढावा घेणे हा यामागचा उद्देश आहे. हा निर्देशांक तयार करताना राज्यांच्या विविध धोरणांचा अभ्यास करण्यात आला आहे. निर्यातीप्रकरणी भारताला व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस आणि फिलिपाईन्स यासारख्या देशांशी स्पर्धा करावी लागत आहे. या निर्देशांकात गुजरातने पहिले स्थान मिळाले आहे.
निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱया तर तामिळनाडू तिसऱया स्थानावर आहे. भूमीवेष्टित राज्यांमध्ये राजस्थान अव्वल आहे. तर पर्वतीय राज्यांमध्ये उत्तराखंड पहिल्या स्थानावर आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली सर्वोत्तम ठरले आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा याप्रकरणी आघाडीवर आहेत. तर मैदानी राज्य असलेल्या छत्तीसगड आणि झारखंडने निर्यातीला बळ देण्यासाठी अनेक प्रकारची पावले उचलली आहेत.
या निर्देशांकात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 4 मुख्य निकषांवर (धोरण व्यावसायिक वातावरण, निर्यातीसाठीचे वातावरण, निर्यातीची कामगिरी) पडताळून पाहण्यात आले आहे. तसेच निर्यातवृद्धी धोरण, निर्यातविषयक सुविधा, अर्थसुविधा, वाहतूक संपर्क यंत्रणा आणि निर्यातीतील वैविध्य यांचाही अभ्यास करण्यात आला आहे.
निर्यात आत्मनिर्भर भारताचा अविभाज्य भाग आहे. आगामी वर्षांमध्ये जागतिक व्यापारात भारताची हिस्सेदारी दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे. दीर्घावधीत आर्थिक विकासासाठी निर्यातीत मोठी वृद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. अनुकूल स्थिती कुठल्याही देशाला जागतिक व्यापारात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी तयार करणे अणि एकीकृत उत्पादन जाळय़ाचा लाभ घेण्यासाठी सक्षम करत असल्याचे उद्गार नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.