सोनिया गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील स्थिती कोरोनामुळे बिघडत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सरकारवर अनेक आरोप केले आहेत. वाढत्या संसर्गामुळे देशात कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही केवळ निर्यात वाढविल्यामुळे देशात लसींचा तुटवडा जाणवत असल्याचा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला आहे.
देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत देखील लसींच्या तुटवडय़ामुळे अडथळे येत असल्यामुळे नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. भारताकडून अन्य देशांना लस निर्यात होत असताना, महाराष्ट्रासह काही राज्यांकडून लसींचा पुरवठा वाढण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान, शनिवारपासून बहुतांश राज्यांना मोठय़ा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आल्यानंतर आता पुन्हा लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे.
सकारात्मक सूचनांची सरकारला ऍलर्जी – राहुल गांधी
अहंकारी सरकारला चांगल्या आणि सकारात्मक सूचनांची अ?Ÿलर्जी असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणे देखील आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली.