अध्याय तेरावा
भगवंत म्हणाले, ज्ञानी मनुष्याच्या लेखी ईश्वराखेरीज इतर गोष्टींचे अस्तित्वच नसते. त्यामुळे त्या असल्या काय आणि नसल्या काय त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणून सर्वकाही भगवंतांवर सोपवून तो निर्धास्तपणे बसलेला असतो आणि जशी प्रेरणा होईल तसे कार्य करत राहतो. ही होणारी प्रेरणा त्याच्या दैवगतीनुसार त्याच्या हातून होणाऱया कर्मासाठी असते. तो ते आणि तेव्हढेच कर्म करतो ज्याप्रमाणे माणसाची सावली त्याच्याजवळ असते. त्याप्रमाणे ज्ञात्याच्या जवळ त्याचा देह असतो. तो देह आपली कर्मे भोगण्यासाठी दैवाच्या ताब्यात राहतो.
आपली सावली आपल्यापासूनच उत्पन्न होते आणि आपल्याच सान्नीध्याने वाढते, तरी ती माझी आहे असा कधी कोणाला गर्व होत नाही. त्याप्रमाणेच ज्ञात्याला देहाचा कधी गर्व होत नाही. छाया ही सदोदित जवळच असली तरी माणूस तिला काहीच किमत देत नाही, त्याचप्रमाणे ज्ञाता देहाला कधीच किमत देत नाही. सावली कधी वि÷sवर पडते किंवा पालखीतही चढते पण त्याचे माणसाला काहीच सुखदुःख नसते. त्याप्रमाणेच ज्ञात्यालाही देहभोगांचे सुखदुःख असत नाही पण ज्ञात्याला आपल्याच देहाचा एव्हढा विसर पडतो तरी कसा? हे समजून घेणे आवश्यक आहे. जो पैसे देऊन दारू पितो, तो त्या दारूच्या धुंदीने नाचू लागतो व गाऊ लागतो. तो खरोखर देहधारी असूनही त्याच्या देहाला विसरून जातो. आपल्या अंगावर वस्त्र आहे की नाही ह्याचीही त्याला शुद्ध नसते आणि ज्ञाता तर ब्रह्मरस सेवन करून परमानंदाने तृप्त झालेला असतो.
ब्रह्मरसाच्या धुंदीने त्यालाही देह जगला की मेला ह्याची फिकीर नसते. तात्पर्य, देहाचे पालन किंवा पोषण, जन्म किंवा मरण, हे सर्व दैवयोगानेच होत असते याचा संपूर्ण स्वीकार त्याने केलेला असतो. प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्याकारणाने देह प्राप्त करून देणारे कर्म संपून तो देह पडण्याचीच वाट पाहात असतो. देहाचे जितके म्हणून वर्तन आहे, तितके दैवयोगानेच होत असते. पूर्वीच्या संचित कर्मामुळे देह उत्पन्न होतो. तो सर्व इंद्रियांसह व प्राणांसह दैव ठरवेल त्याप्रमाणेच वागत असतो. कुणी म्हणेल की, दैवयोगाने जर देहामध्ये आहे, तर संगतीमुळे देहाची अहंता वाढणारच. मिठामुळे पाणीसुद्धा खारे होऊन जाते, त्याप्रमाणे ज्ञातासुद्धा देहाच्या संगतीने देहाभिमानी होऊ शकतो आणि देहाच्या संगतीने ज्ञाताही सुखदुःखे भोगल्याशिवाय कसा राहील ? परंतु ही गोष्ट ज्ञात्यांना लागू होत नाही. कारण, त्यांनी सर्व अहंभाव सोडून ते चिदानंदामध्येच समाधिस्थ झालेले असतात. अत्यंत निर्दोष समाधी त्याने आत्मज्ञानाने उत्तम साधलेली असते.
ती समाधी नक्की कशी असते ? समाधी घेतलेला मनुष्य लाकडाच्या ओंडक्मयाप्रमाणे एकाच जागी पडून असतो का ? समाधीतील मनुष्य निखालस वेडा असतो की ज्ञानसंपन्न असतो ? असेही प्रश्न गैरसमजामुळे लोकांच्या मनात येतात. त्यांचे उत्तर असे की, केवळ एकाच जागी लाकडाच्या ओंडक्मयाप्रमाणे पडून राहणे म्हणजे समाधी, असे वाटत असेल तर ती काही खरी समाधी नव्हे. त्याला बेशुद्धावस्था असे म्हणतात. सदोदित निरभिमानपणाने राहणे याचेच नांव अखंड समाधी होय. निखालस लाकडाप्रमाणे होऊन पडणे ही काही समाधी अवस्था होत नाही. कारण लाकडाच्या ओंडक्मयाला कुठल्याच भावभावना नसतात. खरी समाधी कशाला म्हणतात ते सांगतो. मनुष्य सहज म्हणून बसल्या जागी अनेक संकल्प करत असतो आणि त्याच्या पूर्णत्वासाठी अनेक विकल्पांवर म्हणजे पर्यायांवर तो विचार करत असतो.
जो मनुष्य प्रपंच, प्रारब्ध आणि उपाधी यातून मुक्त झालेला असतो तो खरा समाधीत असतो कारण त्याच्या सर्व संकल्पांचा शेवट झालेला असतो. संकल्पच नसल्यामुळे त्याबद्दलचे कोणतेही विकल्प त्याच्या विचाराधीन नसतात. मनाच्या या अवस्थेचे नाव निर्विकल्प समाधी होय. समाधी म्हणजे काही काळची तटस्थता असा बऱयाच जणांचा समज असतो पण तो चुकीचा आहे.
क्रमशः