देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यात भाजपने आपल्या विजयाचा डंका वाजवला आहे तर पंजाबमध्ये काँग्रेस, अकाली दल आणि भाजपसह इतर सर्व राजकीय पक्षांना नाकारून जनतेने आम आदमी पक्षाला प्रथमच एक पूर्ण राज्य बहाल केले आहे. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मिळवलेले घवघवीत यश आणि आपने पंजाबमध्ये मिळवलेली एकहाती सत्ता या दोन निकालांना राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने खूपच महत्त्व आहे. भाजपच्या दृष्टीने उत्तर प्रदेशचा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा निकाल होता. शेतकऱयांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेले विरोधातील वातावरण, योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराजी आणि गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे निर्माण झालेली भटक्मया जनावरांची गंभीर समस्या, लखमीपुरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चिरडले गेलेले शेतकरी, शेतकरी आंदोलनाने भाजपला पराभूत करण्याचे केलेले आवाहन, पक्षातील मंत्री आमदारांनी ऐन निवडणुकीच्या वेळी राम राम करणे आणि सोशल मीडियाचा वापर करून आक्रमकपणे प्रचारात उतरलेले अखिलेश यादव या साऱया आव्हानाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सामोरे जायचे होते. पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणूक त्यासाठी महत्त्वाची होती. पंजाबमध्ये भाजप संघटना फारशी प्रभावी नव्हती. देशाच्या राजकारणातून मोदींना हद्दपार करायचे म्हणून देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अखिलेश यादव यांची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला होता. त्याला भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नीतीने सामोरे गेला आणि पुन्हा एकदा त्यांनी यश मिळवले. त्रासदायक ठरणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय, आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार, राम मंदिर आणि काशी मथुरे बाबतीतील भाष्य, 80 टक्के जनता विरुध्द 20 टक्के जनता अशी विभागणी हे मुद्दे प्रभावी ठरले. जोडीला मायावतींना गप्प बसवण्याचे आणि त्यांचा समाजवादी पक्षाविरोधात वापर करण्याचे कसब, समाजवादी पक्षाचे राज्य आले तर राज्यात पुन्हा गुंडाराज सुरू होणार हा जनतेला दिलेला इशारा आणि त्या सर्वांच्या बरोबरीने ‘फर्क साफ दिखता है’ अशी केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशभरतील लोकांना अपील होईल अशा पद्धतीने प्रसारित केलेली जाहिरात, या सर्वांचा एकत्रित फायदा भाजपला झाला. पश्चिम उत्तर प्रदेशात आणि लखमीपुरात सुद्धा यशामुळे काँग्रेसला अजून गलितगात्र करण्यात भाजप यशस्वी झाला आहे. त्याहीपेक्षा भाजपपासून अंतर राखून असलेले आणि दोन वर्षांनी होणाऱया लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी गोटात सामील होऊ शकतील असे सगळेच प्रादेशिक पक्ष या निकालाने धास्तावणार आहेत. पंजाबमध्ये अशाच पद्धतीचे यश आम आदमी पक्षाने मिळवले आहे. हा त्यांच्या ‘दिल्ली मॉडेल’चा परिणाम असल्याचे सांगितले जाते. शेतकरी आंदोलनाच्या काळात दिल्लीत पोहोचलेल्या शेतकऱयांनी येथील शाळा उत्सुकतेने पाहिल्या, वीज आणि पाणी बिलाच्या बाबतीतील फरक अनुभवला आणि असेच सरकार आपल्या भागात असले पाहिजे अशी त्यांची धारणा झाली असे आता आम आदमी पक्षाबाबत सांगितले जात आहे. अर्थात दिल्ली हे पूर्ण राज्य नव्हते आणि आता त्यांना पंजाब हे एक पूर्ण राज्य मिळाले आहे. निवडणुकीच्या अंतिम काळात केजरीवाल यांचे खलिस्तानवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. पण पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या भागातसुद्धा आपने आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. जाट मतदारांनी सुद्धा अकाली दलाचा हात झटकून झाडू आपला केला. बादल परिवारालाही जनतेने धूळ चारली. निवडणुकीपूर्वीच वाताहत झालेल्या काँग्रेस पक्षाची नाचक्की पंजाबी जनतेने केली. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनाही भुईसपाट केले. चेन्नी आणि सिद्धू यांचा विदुषकी कारभार काँग्रेसला आणखी गाळात रुतवून गेला. आम आदमी पक्षाच्या यशामध्ये त्यांच्या विकासाच्या आणि भ्रष्टाचार मुक्त मॉडेल बरोबरच त्यांनी जो 10 कलमी कार्यक्रम दिला आहे त्यामध्ये नशा मुक्ती, शिक्षणावर जास्त खर्च, वीज-पाणी मोफत पासून अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. कदाचित आपला पक्षाचे मुख्यमंत्री मान यांनाच नशामुक्त करून या कार्याची सुरुवात करावी लागली तर नवल वाटणार नाही. कवी मनाचे मान या जबाबदारीमुळे बदलतीलही. या निकालाने केजरीवालसुद्धा राष्ट्रीय नेते बनू शकतात आणि मोदी यांना पर्याय ठरू शकतात असा प्रचार आपने सुरू केला आहे. अर्थातच त्यामुळे काँग्रेसच्या उरात धडकी भरणार आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी, केसीआर यांच्यापाठोपाठ विरोधी तंबूत आणखी एक नेत्याचे नाव चर्चेला येणार आहे. पण खुद्द केजरीवाल या विरोधकांच्या सोबतीने वाटचाल करतील का? हा प्रश्नच आहे. यंदाच्या वर्षाखेरीस होऊ घातलेल्या गुजरात निवडणुकीत त्यांनी जर भाजपला आव्हान दिले तर त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. हे काँग्रेसला माहित आहे. आपने गुजरातमध्ये येणे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. हरियाणाच्या निवडणुकीत जेव्हा भाजप आणि आप एकमेकासमोर येतील तेव्हा केजरीवाल यांच्या राजकारणाचा कस लागेल. गोव्याच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा सत्ता स्थापन करण्याची कसरत करून दाखवली आहे. बाहेरून आलेल्यांनी काँग्रेस फोडून अनेक इच्छुकांसाठी नवे पर्याय उभे केले. पण यामुळे काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. पी चिदंबरम यांच्या मुक्कामाला आणि जोडतोडीसाठी पवारांची साथ यांची गरजच भासली नाही. उत्तराखंडमध्ये तीन-तीन मुख्यमंत्री बदलून केलेले प्रयोग सुद्धा पथ्यावर पडले. निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणखी भक्कम झाले आहे. नितीशकुमार सारखे नेते आता तंबूत हाल सोसूनही गप्प राहतील. जगमोहन रेड्डी, नवीन पटनायक सारखे मुख्यमंत्री केंद्राशी अधिक जुळवून घेतील. छोटय़ा राज्यांतही, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड सारख्या राज्यांमध्ये सत्ता उलथवण्याचे प्रयोग अधिक तेज होतील. योगी मोदींनंतरचे नेते ही चर्चाही सुरुच राहील.
Trending
- येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील; शरद पवारांचे धक्कादायक विधान
- एसएसएलसीचा निकाल उद्या होणार जाहीर , किती वाजता? निकाल कसा पाहायचा?
- रस्ता ओलांडताना आराम बसच्या धडकेत महिला ठार; परिते गावातील घटना
- सरुडमध्ये उत्स्फूर्तपणे ८५ टक्के मतदान : भर उन्हातही मतदानासाठी मतदाराच्या रांगा.
- माशवी – गावव्हाळ येथे रिक्षा व आराम बसमध्ये अपघात
- कडक ऊन्हातही शांततेत 75 टक्के मतदान
- सांगली जिल्ह्यात जुगाड आघाडी! कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे झुकत नेत्यांनी महायुती, महाआघाडी मोडली!
- टक्का वाढला : 74.92 टक्के मतदान