रेडिओ ही अशी चीज आहे की जी कधी कालबाह्य झालीच नाही आहे. उलट काळासोबत स्वतःला बदलत किंवा माध्यमं बदलत तो आपल्यासोबत येतोच आहे. अगदी कार किंवा ट्रकपासून ते? मोबाईलपर्यंत. शेकडय़ाने खासगी चॅनल सुरू झाली आहेत तिथेही. पण अचानक आवडीचं गाणं अनपेक्षितपणे ऐकू येणं यात जो अपरिमित आनंद आहे तो आपला रेडिओच देऊ जाणे. रात्री झोपता झोपता असाच एक गीतमालिकेचा कार्यक्रम सुरू असताना एकाएकी एक गाणं लागलं.
निळे गगन निळी धरा निळे निळे पाणी
ही आगळी कहाणी ही वेगळी कहाणी
स्वच्छ नितळ निळय़ा पाण्यासारखा असलेला गायकाचा सूर, चित्रदर्शी असणारे त्या गीताचे शब्द हलकेच मनात शिरून झुळूझुळू वाहू लागले. मायमाउली असलेल्या मातीमायचा पुत्र, त्याची रानावनाशी, त्यात वावरणाऱया साध्यासुध्या रांगडय़ा माणसांच्या जगण्याशी असणारी एकरूपता हे सगळं इतकं सुंदर पद्धतीने त्या गाण्यात मांडलंय की ते गाणं अलवारपणे मनाला जोजवीत राहतं. गाणं अंगाई होतं हे खरंच पण गाणं पाळणासुद्धा होतं हे मोठं नवल. दिवसभराच्या श्रमाने थकलेल्या माणसाला डोळे मिटता मिटता एक साधंसुधं गाणं हवं असतं. मोठय़ा तयारीचं किंवा डामडौलाचं नकोच असतं. ही गाणी अशाच टाईपमधली असतात. अंगणात, ओसरीत, दिवा लावायला जाताना सोबत करणारी. मी आहे तुझ्यासोबत. नको एकटं वाटून घेऊस, असं म्हणणारी! कातरवेळ ही त्यातली खरं तर सगळय़ात अडचणीची दुखरी वेळ. पण जर का तेव्हा
निळय़ा आभाळी कातरवेळी चांदचांदणे हसती
मी हुरहुरते मनात झुरते दूर गेले पती
हे गाणं कानावर पडलं तर आपण त्यात रंगून जातो. ‘मोहित्यांची मंजुळा’ मधलं हे गाणं विरहिणीची भावना आणि आपल्या पतीवरचं तिचं प्रेम इतक्मया नजाकतीने दाखवतं! कारण विरह तर आहे, हुरहूरही आहे पण ती व्यक्त करणारी स्त्री एका उच्चकुलीन घराण्यातील मर्यादशील गृहिणी आहे, सून आहे. संयम आणि वळणाचं बाळकडू प्यायलेली आहे हे त्या सुरासुरातून जाणवत राहतं. संगीतकाराची तर धन्यच आहे पण लतादीदींना पुनःपुन्हा नमस्कार! कारण या गाण्याचं ‘डीटेलिंग’ करणं म्हणजे दागिना घडवण्याहून कठीण! त्यांनी ते लीलया केलंय पण विचार केला तर हे किती ?अवघड आहे त्याचा थांगपत्ता लागत नाही.
पानांचे मधुगीत गाउनी थेंबांचे पदि नुपूर बांधुनी
रिमझिमणाऱया तालावरती नर्तन करी लयकारा
मयुरा रे फुलवित ये रे पिसारा
या गाण्यातील वर्णन तर सगळं पावसाळी आहे. हाकही मारलेली आहे ती मयूर अर्थात मोराला. पण सृष्टीला हिरवळून टाकणाऱया या मृगराजाला आवाहन करताना शपथ घालावी लागते ती मात्र अंबरातल्या निळय़ा घनाची. वीणा चिटको यांनी लिहिलेल्या या गीताला संगीतबद्ध केलंय त्यांनीच! मास्तर कृष्णराव यांच्या कन्या असलेल्या वीणा चिटको या स्वतः कवयित्री, लेखिका, संगीत दिग्दर्शक आणि गीतकारही होत्या. शिवाय मराठी भावगीताच्या क्षेत्रातल्या त्या पहिल्या संगीतकार! या गाण्यातील ‘निळय़ा घनाची’ हे शब्द त्याची निळाई व त्याबरोबरच त्याची अथांगता स्पष्ट होईल असे स्वरबद्ध केलेले आहेत. गाणं बोलतं म्हणतात ते असं. गीतकार आणि संगीतकार एकच असेल तर स्वर आणि शब्द यात सांधेजोड कुठेच राहत नाही. बा.भ. बोरकर यांच्या कवितांच्या बाबतीत असंच होतं. त्यांच्या कित्येक कवितांची गीतं झाली. कित्येकांनी त्यांना संगीतबद्ध केलं आहे, पण पुलं म्हणत त्याप्रमाणे बोरकरांच्या कवितांना कुठली चाल सर्वात जास्त साजून दिसते तर ती बोरकरांचीच! कारण त्यांची कविता ही जन्माला यायची तीच मुळी गात गात!
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
चंचलतनु चपलचरण अनिलगण निघाले
हीच कविता घ्या. त्यांचे पुतणे श्री. घनःश्याम बोरकर यांनी ती कविता मूळ नैसर्गिक चालीत गायलेली आहे. तिचा ‘मूड’ परफेक्ट पकडणारे सूर तिच्या हातात हात घालूनच उमटले आहेत. पावसाचे ढग काळे असतात, पण आकाशाने कौतुकाने त्याबरोबर पाठवलेलं गडद निळेपण जाणवतं ते कवीला. म्हणूनच की काय, त्यांच्या ‘नाही पुण्याची मोजणी’ मध्ये ते
आम्हा नाही नाम रूप आम्ही आकाशस्वरूप
जसा निळा निळा धूप, जसा निळा निळा धूप
सारख्या जादुई ओळी सहजगत्या लिहून गेले आहेत. धूपाच्या सुगंधी वलयातलं निळय़ा छटेचं आकाश त्यांनी पाहिलं आहे! अशी गाणी ऐकताना मनही निळं होऊन जातं. तसं म्हणायचं तर त्यांना रंगाचं, त्यातही निळय़ा रंगाचं फारच आकर्षण असावं.
निळावतीच्या दीपकळय़ांनो आला माझ्या घरी
नाचुन गाउन रंगविली ही मम अंगण ओसरी…
असं हे निळय़ाचं वेड! अर्थात हेच वेड कविवर्य पाडगांवकरांनाही होतं.
संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा
सारख्या गीतातून ते येतं. जगातलं ग्रेट काव्य असा उल्लेख होणाऱया गीतरामायणात एक अप्रतिम गीत आहे. निळय़ाचं निळंच कौतुक सांगणारं!
सावळा गं रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधांचा सुवास निळय़ा कमळांना येतो
सावळा गं रामचंद्र चार भावांत खेळतो
हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो
जो स्वतःच नीलवर्णनाटय़ घडवतो त्याचं लडिवाळ कौतुक करायला निळय़ा रंगाचा उजाळा नको का? हे निळय़ाचं वेड संतश्रे÷ तुलसीदासांनासुद्धा आवरता आलेलं नाहिये. म्हणूनच तेही
कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीरज सुन्दरम
असं त्या रामाचं वर्णन करतात. नुकत्याच उमललेल्या निळय़ा कमळाकडे पाहिलं किंवा त्याच्या पाकळय़ांना स्पर्श केला तर कदाचित जाणवेल आपल्याला रामरायाचा कोमल निळेपणा! ओटय़ाशी वावरणाऱया साध्यासुध्या गृहिणीपासून ते ‘अवघ्या बाहूंत म्या व्योम कवळिले’ म्हणणाऱया संतकवींपर्यंत सर्वजण हे निळं कोडं सोडवीत आले आहेत. पण गंमत अशी की दरवेळी त्या कोडय़ाला नव्या वाटा फुटतात. त्या चैतन्याचं वर्णन आमची ज्ञानेश्वर माऊली करते ते
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा
विठा देखियेला डोळा बाईया वो
अशा आगळय़ावेगळय़ा प्रकारे. विठ्ठलाला सरळ सरळ फक्त निळा म्हणून उल्लेख करणं म्हणजे निळय़ा रंगाचं त्या परमेश्वराशी असणारं अद्वैतच दाखवून देणं होय! म्हणूनच तर
निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात
सारख्या गाण्यात गंगाधर महांबरे यांनी अक्षरशः निळय़ाचा सोहळा उभा केला आहे. हे फक्त दोन कडव्यांचं झालं असलं तरी मूळ कविता चांगली सहा कडव्यांची आहे. आणि त्यात ठायी ठायी निळाई आहे. म्हणूनच की काय घननीळाचं हे रूप मनालाच निळेशार करून सोडत असतं आणि गाण्यातून झरत आणि पाझरत असतं.
-अपर्णा परांजपे-प्रभू