संपूर्ण शाळा, परिसरात राबविले स्वच्छता अभियान : पावसाळय़ात पोषण आहारासाठी जमा केला लाकूडफाटा
- शाळा धुऊन-फुसून केली स्वच्छ
- क्वारंटाईन नियमांचे तंतोतंत पालन
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
ज्या शाळेने आपणास सज्ञान बनवत रोजीरोटी मिळविण्यालायक बनवले, कोरोनासारख्या गंभीर संकटात आधार दिला, त्या शाळेत कुठल्याही सोयी-सुविधा नाहीत म्हणून तिची अवहेलना करीत न बसता, या क्वारंटाईन काळात हातात झाडू, कोयता, फावडे घेऊन शाळेची आपल्या घराप्रमाणे साफसाफाई, परिसर स्वच्छता व डागडुजीची कामे करीत निवजे शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेल्या चाकरमान्यांनी एक नवा आदर्श घालून दिला. या शाळेचे आमच्यावर अनंत उपकार असून आम्ही केलेले हे काम ही शाळेप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याची भावना या क्वारंटाईन चाकरमान्यांनी व्यक्त केली. यापूर्वी देवगड तालुक्यातील पडेल येथेही क्वारंटाईन झालेल्या चाकरमान्यांनी असा उपक्रम राबविला होता.
कोरोनाच्या वाढत्या संकटात मुंबई-पुण्यातून गावी परतणारे चाकरमानी गावात दाखल झाल्यानंतर त्यांची रवानगी संस्थात्मक क्वारंटाईनसाठी गावागावांतील प्राथमिक स्तरावरील मराठी शाळांमध्ये केली जात आहे. या शाळांमध्ये फारशा सोयी सुविधा नसल्यामुळे अनेक क्वारंटाईन चाकरमानी प्रशासन व गाववाल्यांच्या नावाने खडे फोडत आहेत. काही ठिकाणी पाटर्य़ा देखील होत असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आणि क्वारंटाईन चाकरमानी यांच्यात संघर्ष उडतानादेखील दिसत आहे. मात्र कुडाळ तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या निवजे या गावात परतलेल्या चाकरमान्यांनी मात्र संस्थात्मक क्वारंटाईन काळात शाळा व परिसरात राबविलेला अनोखा स्वच्छता उपक्रम खरोखरच सर्वांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालणारा ठरला.
उभा केला नवा आदर्श
मुंबईतील उद्योग, व्यवसाय बंद पडल्यामुळे निवजे या छोटय़ाशा गावात आतापर्यंत 85 चाकरमानी गावी परतले आहेत. या पैकी बहुतांशी चाकरमान्यांनी संस्थात्मक क्वारंटाईन पूर्ण करून आपले घर गाठले. तर उशिरा दाखल झालेल्या 18 चाकरमान्यांची व्यवस्था गावातील निवजे शाळा नं. 1 मध्ये करण्यात आली आहे. या शाळेतील चार खोल्यांमध्ये या चाकरमान्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व चाकरमानी गावातील याच शाळेत शिकून मोठे झाले होते. त्यामुळे संस्थात्मक क्वारंटाईनसाठी त्यांनी आपली ही शाळा आनंदाने स्वीकारली. शाळेतील सोयी-गैरसोयींबाबत तक्रारी करीत बसण्याऐवजी शाळेच्या इमारतीच्या आत व बाहेरील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला. शाळेतील 18 चाकरमान्यांचे 36 हात कामाला लागले. बघता-बघता शाळेची इमारत धुऊन-पुसून स्वच्छ झाली. शौचालय, बाथरुम स्वच्छ झाले. छपराची डागडुजी झाली. शाळेसमोरील अंगण, मुलांनी बनविलेली बाग, शाळेपाठीमागची झाडी साफ, स्वच्छ झाली. मुलांनी शाळेसमोर बनवलेला बगिचा पुन्हा टवटवीत झाला. झाडांना पाणी मिळाले. इथपर्यंत हे चाकरमानी थांबले नाही. त्यांनी पावसाळ्य़ात पोषण आहार शिजवण्यासाठी शाळेला लाकुडफाटा कमी पडू नये म्हणून शाळेत लाकूडफाटा आणून पावसाळय़ातील चिंताही दूर केली. अशा पद्धतीने या सर्व क्वारंटाईन चाकरमान्यांनी या शाळेला नवा साज चढवत सिंधुदुर्गात येणाऱया चाकरमान्यांसमोर नवा आदर्श घालून दिला. चाकरमान्यांच्या या कामगिरीने निवजे ग्रामस्थही कमालीचे खूष झाले.
राजकीय पक्षांची भूमिका निंदनीय – क्वारंटाईन चाकरमानी
संपूर्ण जिल्हय़ात आदर्शवत ठरलेल्या या उपक्रमाला प्रत्यक्ष भेट देत ‘तरुण भारत’ने या क्वारंटाईन चाकरमान्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, आम्ही काही फार मोठे काम केले नाही. आम्ही आमचे कर्तव्य निभावले आहे. क्वारंटाईनच्या सर्व नियमांचे आम्ही तंतोतंत पालन करीत आम्ही गाववाल्यांना अडचणीत आणू दिले नाही. मुंबईत उद्योग व्यवसाय बंद पडल्याने खूपच अडचण निर्माण झाल्याने पोटापाण्यासाठी आम्ही गावी परतलो आहोत. जोपर्यंत मुंबईतील कोरोनाचे अरिष्ट दूर होत नाही, तोपर्यंत गावात राहून येथील शेती-बागायतीवर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. आता या गावाचाच आम्हाला आधार आहे. मुंबई पूर्वपदावर आली की आम्ही मुंबईला जाऊ, असे ते म्हणाले. या गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सरपंच व संपूर्ण महसूल यंत्रणेचे उत्तम सहकार्य आम्हाला मिळत आहे. चाकरमानी आणि गाववाले यांच्यात एक वेगळ नातं आहे. गाववाले मुंबईकरांच्या आणि मुंबईवाले गाववाल्यांच्या मदतीला सदैव धावत असतात. मात्र सध्या विविध पक्षाचे राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी जी मन कलुषित करीत आहेत, ही बाब अतिशय निंदनीय आहे. हे त्वरित थांबले पाहिजे, असे ते म्हणाले.