बेळगावमधील गणेश भक्तांमधून सवाल, सरकारच्या मार्ग सूचीचा केला निषेध
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवावेळी होणाऱया गर्दीमुळे कोरोना वाढेल या भितीपोटी राज्य सरकारने राज्यात पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव करण्याची मार्गसूची जाहिर केली. निवडणुका घेतल्या जातात, पक्षाच्या सभा बोलाविल्या जातात यामुळे कोरोना पसरत नाही का? केवळ गणेशोत्सवामुळेच कोरोनाचा धोका आहे? असा संतप्त सवाल बेळगावमधील गणेश भक्तांमधून सरकारला विचारला जात आहे. केवळ हिंदू सणांवरच राज्य सरकार निर्बंध घालत असल्याने हे खपवून घेतले जाणार नाही असा ईशाराच कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी दिला आहे.
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला असताना कर्नाटक राज्य सरकारकडुन मार्गसूची जाहिर करण्यात आली. एक वॉर्ड एक गणपती, एक गाव एक गणपती, मिरवणुकीला परवानगी नाही. तसेच राज्यात केवळ पाच दिवसांचा सार्वजनिक गणपती असेल अशी मार्गसूची राज्य सरकारने रविवारी दुपारी जाहिर केली. सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र पडसाद दिसू लागले. बेळगावमध्येही गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेश भक्तांमधून या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
राज्य सरकारने निर्णय मागे घ्यावा
मुंबई – पुणे या शहरानंतर सर्वात मोठा गणेशोत्सव हा बेळगावमध्ये साजरा होतो. त्यामुळे कोणीही गणेशोत्सवावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करू नये. मागील वषी देखील सरकारने घालुन दिलेल्या मार्गसूचीप्रमाणेच अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यावषीही असाच साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होईल, परंतु राज्य सरकारने निर्बंध मागे घ्यावेत असे भालचंद्र गिंडे यांनी सांगितले.
– भालचंद्र गिंडे – (अध्यक्ष – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जालगार गल्ली)
हिंदू सणांवरच निर्बंध का?
निवडणुकांसह राज्यात इतर सर्व कार्यक्रम गर्दीत सुरू आहेत. मग हिंदू सणांमध्येच राज्य सरकारचा हस्तक्षेप का? बेळगावमध्ये 11 दिवसांचा पारंपारिक गणेशोत्सव साजरा होतो. यामध्ये आडकाठी घालण्याचा झालेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. बेळगावमध्ये पारंपारिक गणेशोत्सव साजरा होणारच. याला विरोध झाल्यास गणेशभक्त रस्त्यावर उतरतील असा ईशारा किरण गावडे यांनी दिला.
– किरण गावडे (सल्लागार – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सोमवार-मंगळवार पेठ टिळकवाडी)
सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा
गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने चालविला आहे. धार्मिक सणांमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करू नये. बेळगाव जिल्हय़ात कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट झाली असल्याने जिल्हय़ात गणेशोत्सवाला परवानगी द्यावी. तसेच सरकारने आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा. सरकारने या निर्णयाचा फेरविचार न केल्यास याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा संताप नेताजी जाधव यांनी व्यक्त केला.
– नेताजी जाधव (अध्यक्ष- शहापूर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ)
सरकारच्या निर्णयाचा निषेधच
राज्य सरकारने केवळ पाच दिवस सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु यामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजन पडले आहे. नियमानुसारच गणेशोत्सव साजरा होईल परंतु अकरा दिवसांची परवानगी मिळावी. राज्य सरकारने हाच निर्णय कायम केल्यास या निर्णयाचा निषेध करू असे रेणु किल्लेकर यांनी सांगितले.
– रेणु किल्लेकर (अध्यक्षा- म. ए. समिती महिला आघाडी)