प्रतिनिधी /म्हापसा
जोसेफ सिक्वेरा आपले पूर्वीचे मित्र आहेत. त्यांनी कळंगुटसाठी मोठे योगदान दिलेले आहे. शिवाय आपण आमदार होण्यामागे त्यांचा मोलाचा हात आणि योगदान आहे. कळंगूट मतदारसंघाचे ते नागरिक आहेत. आपले त्यांच्याशी काहीच वैरत्व नाही आहे. उलट तेच आम्हाला घरी पाठविण्याची भाषा करीत आहेत. आपल्या कळंगुटमध्ये सर्वत्र घेऊन ते फिरले आहेत. आम्ही दोघांनीही कळंगुटसाठी खूप काम केले आहे आणि करीत आहोत. घरी पाठविण्याचे काम कळंगूट, कांदोळी, हडफडे, नागवा पर्राचे लोक ठरविणार आहेत. अशी माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
जोसेफ सिक्वेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण यावेळी मंत्री मायकल लोबो यांना घरी पाठविणार असे सांगितल्यावर मंत्री लोबो पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले एकामेकाकडे भांडणे हे आदीपासून सुरू आहे. सध्या पंचायत व विधानसभा निवडणुका जवळ पोचल्या आहेत यासाठी आपण त्यांच्यापेक्षा मोठा हे दाखविण्यासाठीच हा आटापीटा आहे. गेल्या पंचायत निवडणुकीत जो कुणी पराभूत झाला आहे त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन वेळ वाया घालण्यापेक्षा तो वेळ कळंगुटच्या नागरिकांसाठी द्यावा, छोटय़ा भांडणात पडण्याची गरज नाही. अशी भांडणे आमने सामने निवडणुका जवळ आल्या की सुरूच राहणार. यामुळे नाहक जनतेला याचा त्रास नको असे मंत्री श्री. लोबो म्हणाले. मी कळंगुटचा कामगार आहे. कळंगुटमध्ये दोघानीही विकास साधला आहे. पूर्वीचे रस्ते व आत्ताचे रस्ते कसे झाले आहेत तेही पहा. कचरा आम्ही जागेवर घातला आहे. मी घरी पाठविणार असे त्यांनी म्हणू नये. वृथा नाहक आरोप नको. घरी लोक पाठविणार आहेत.
तक्रार करून सहानुभूती मिळणार नाही
स्वप्नेश वायंगणकर यांनी जी तक्रार केली आहे ते गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांनी यापुढे जाऊन प्रयत्न करावेत. त्यांनी लोकांमध्ये रहावे, तक्रार करून काहीच साध्य होणार नाही. लोकांची कामे करावीत. तक्रार करून तुम्हाला सहानुभूती मिळणार नाही. निवडणुकीमुळे अशा अनेक तक्रारी होणार असे मंत्री लोबो म्हणाले.