पीलीभीतमध्ये कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद यांचे विधान
उत्तरप्रदेशच्या पीलीभीतमधील बीसलपूर येथे राज्याचे मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपच्या प्रचाराकरता सभा घेतली आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच उत्तरप्रदेशचे भले होणार असल्याचे म्हणत प्रसाद यांनी निवडणुकीच्या मैदानात योद्धय़ाप्रमाणे उतरा आणि युद्ध जिंका असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
बीसलपूर मतदारसंघातील भाजप उमदेवार विवेक वर्मा यांच्या समर्थनार्थ आयोजित ब्राह्मण संमेलनाला त्यांनी संबोधित केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यासारखे त्यागी, तपस्वी, जनसवेक आणि देशाबद्दल समर्पणाच्या भावनेने कार्य करणाऱया लोकप्रिय नेत्यांचे नेतृत्व मिळणे हे भाजपचे सौभाग्य आहे. डबल इंजिनच्या सरकारमुळेच उत्तरप्रदेशचा चहुबाजूने विकास होऊ शकणार असल्याचे ते म्हणाले.
मतदारसंघात कमळाचे फूल फुलल्यास केवळ उमेदवाराचा विजय होणार नसून योगी-मोदींचाही विजय होणार आहे. नव्या भारताची निर्मिती करण्यास मदत होणार आहे. बीसलपूरशी वडिलांच्या काळापासूनच माझे दृढ संबंध आहेत. या संबंधांचे ऋण अद्याप फेडू शकलेलो नाही. भाजप उमेदवार विजयी झाल्यावर त्याच्यासोबत मिळून लखनौपासून दिल्लीपर्यंत विकासकामे करवून घेण्यास सहकार्य करणार आहे. लोकांच्या सन्मानाला कुठल्याही प्रकारे ठेच पोहोचू देणार नसल्याचे जितिन प्रसाद म्हणाले.