वृत्तसंस्था /लखनौ
उत्तरप्रदेश भाजपमधील संकट शमण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत. गुरुवारी एका दिवसात 4 आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर आतापर्यंत राजीनामा दिलेल्या आमदारांची संख्या 10 वर पोहोचली आहे. औरयातील विधूनाचे आमदार विनय शाक्य, योगी सरकारमधील आयुष मंत्री धर्मसिंह सैनी, शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा आणि लखीमपूर खीरीचे आमदार बाला प्रसाद अवस्थी यांनी गुरुवारी राजीनामा दिला आहे. चारही नेत्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
स्वामीप्रसाद यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तिंदवारीचे आमदार ब्रजेश प्रजापति, आमदार रोशनलाल वर्मा, भगवती सागर यांनी राजीनामा दिला होता. तसेच अवतार सिंह भडाना यांनी बुधवारी रालोदमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती.
भाजपमधील पलायनादरम्यान स्वामीप्रसाद यांचा नवा ट्विट समोर आला आहे. नागरुपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सापरुपी भाजपला स्वामीरुपी मुंगूस उत्तरप्रदेशातून संपवूनच स्वस्थ बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार शाक्य यांनी गुरुवारी स्वामीप्रसाद यांच्या घरी धाव घेतली होती. भाजपमध्ये आमची कामे होत नव्हती तसेच सन्मानही मिळत नव्हता असा दावा त्यांनी केला आहे. राज्य सरकारने 5 वर्षांच्या कार्यकाळात दलित, मागास आणि अल्पसंख्याक समुदायांचे नेते आणि लोकप्रतिनिधींना कुठलेच महत्त्व दिले नाही. राज्य सरकारच्या अशा भूमिकेमुळेच भाजपमधून बाहेर पडत आहे. स्वामीप्रसाद हे शोषितांचा आवाज आहेत, ते आमचे नेते असल्याचे शाक्य यांनी म्हटले आहे.