बेंगळूर : राज्यात कोणत्याही क्षणी निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. मात्र, राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे.
भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलासंबंधी सुरू असलेल्या चर्चेविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, भ्रष्ट असणाऱया मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा घेणे योग्यच आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद दूर करण्यात भाजप अपयशी ठरल्यास निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे का?, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, कोणत्याही क्षणी निवडणुकीला सामोरे जाण्यास काँग्रेस पक्ष तयार आहे. मात्र येडियुराप्पांना राजीनामा द्यावा लागला तरी मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही. राज्यात मुख्यमंत्रीबदल होणार असल्याचे आपण याआधी सांगितले होते. मात्र, त्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता, असे ते म्हणाले.