प्रतिनिधी/ वास्को
निवडणूक अजेंडा नजरेसमोर ठेऊन गोव्यात काही जणांकडून विकास प्रकल्पांना विरोध होऊ लागलेला असून लोकांनी त्यांच्या विरोधाला बळी पडू नये. या विरोधामागील राजकारण भाजपाच्या कार्यकर्त्यानी लोकांना समजावून सांगावे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजनांचे लाभ पोहोचवावेत. कार्यकर्त्यांच्या बळावर येणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपाच पुन्हा सत्तेवर येणार हा आपला ठाम विश्वास आहे, असे प्रतिपाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाबोळी येथे केले.
भाजपाने आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मुख्यमंत्र्यांनी रविवारी दुपारी दाबोळीतील चिखली पंचायत सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पंचायमंत्री माविन गुदिन्हो, सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य ऍड. अनिता थोरात, बोगमाळोचे सरपंच लॉरेन कुन्हा, चिखलीचे सरपंच सेबी पेरेरा, स्थानिक पंच संकल्प महाले, तसेच गट अध्यक्ष संदीप सूद, संतोष केरकर, सर्वानंद भगत, सत्यविजय नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपात सामान्य कार्यकर्ता बनतो मुख्यमंत्री
मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपल्या सारखा सामान्यातील सामान्य कार्यकर्ताही या पक्षात मुख्यमंत्री होऊ शकतो हे या पक्षाचे मोठेपण आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आपला पूर्ण विश्वास असून कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपा गोव्यात पुन्हा सत्तेवर येणार आहे.
वेळप्रसंगी कोळसा बंद करण्यासही मागेपुढे पाहणार नाही
कार्यकर्त्यांनी स्वंयपूर्ण गोवा बनवण्यासाठी समाजातील शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवाव्यात. विकास जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कार्यकर्तेच चांगल्या प्रकारे करू शकतात. आज गोव्यात काही जणांकडून निवडणूक अजेंडा नजरेसमोर ठेवून विकास प्रकल्पांना विरोध होऊ लागलेला आहे. मात्र, लोकांनी त्यांच्या विरोधाला बळी पडू नये. कार्यकर्त्यांनी या विरोधामागील राजकारण लोकांना समजावून सांगावे. सरकार लोकांसाठीच काम करीत आहे. गोवेकरांना काय हवे आणि काय नको याची सरकारला पूर्ण कल्पना असून सरकार गोव्यात कोळसा वाढू देणार नाही. तो आहे त्या पेक्षा पन्नास टक्क्यांनी कमी होईल. वेळ आल्यास हा कोळसा बंद करण्यासही सरकार मागे पुढे पाहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
... अन्यथा दोन वर्षांत गोव्यात वारंवार वीज शटडाऊन
मोलेहून येणाऱया वीज वाहिन्या जर गोव्यात आल्या नाहीत तर येणाऱया दोन वर्षांत गोव्यात वीजेअभावी वारंवार शटडाऊन करावे लागेल. अपुऱया विजेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतील. विजेअभावी पाणी पुरवठय़ावरही परिणाम होईल हे ओळखायला हवे. गोव्यात पेडणेपासून काणकोणपर्यंत महामार्ग बनत आहे. काणकोणच्या बायपास रस्त्यामुळे 21 किलोमिटरचे अंतर आता केवळ 7 मिनिटांत कापले जात आहे, असे स्पष्ट करून विकासाची अडवणूक होऊ देऊ नये. लोकांनी विरोधाला बळी पडू नये असे मुख्यमंत्री म्हणाले.
खाणी सुरू होण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल
आपण दिल्ली भेटीत केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, गृहमंत्री अमित शहा व इतर नेत्यांच्या भेटी घेतल्या. गोव्याच्या खाण प्रश्नावरही चर्चा झाली. लवकरच खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे राज्य आर्थिकदृष्टय़ाही मागे राहणार नाही.
गोवामुक्तीच्या षष्टय़ब्दीमुळेही विरोधकाच्या दुखते पोटात
सरकार गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करणार आहे. या योजनेमुळे काहींच्या पोटात दुखू लागलेले आहे. मात्र, सरकार विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. साठाव्या वर्षांनिमित्त गोव्यातील बाराही तालुक्यात कार्यक्रम होतील. विद्यार्थी, कलाकार, गोरगरीब अशा सर्वांपर्यंत सरकार पोचणार आहे. गोवा कसा आहे, गोव्याची संस्कृती काय आहे यासंबंधीची माहिती देशातच नव्हे तर देशाबाहेर पोहोचवली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. या शिबिरात मंत्री माविन गुदिन्हो यांनीही मार्गदर्शन केले.