राजेश जाधव/ चिपळूण
मतदार नोंदणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी यावर्षी लोकशाही दीपावली स्पर्धांचे आयोजन केले आहे. आकाशकंदील व रांगोळीतून मतदार नोंदणी व अन्य बाबींचा संदेश देणाऱया विजेत्यांना भरघोष बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धेत भाग घेणाऱयांना 15 नोव्हेंबरपर्यंत छायाचित्र अन् चित्रफित पाठवावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षापासून निवडणूक आयोग मतदार नोंदणी, निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसत आहे. ही स्पर्धा त्याचाच एक भाग आहे. मतदार याद्यांच्या अद्यायावतीसाठी तसेच मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असते. यावर्षी हा कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून राबवण्यास सुरूवात झाली असून तो 30 नोव्हेंबरपर्यंत राबवला जाणार आहे. या दरम्यान जानेवारी 2022 पर्यंत 18 किंवा अधिक वय असलेल्यांना मतदार यादीत आपले नाव नोंदवता येणार आहे.
हा कार्यक्रम सुरू असतानाच सध्या दिवाळी सुरू झाली आहे. सक्षम लोकशाहीची पहिली पायरी ही मतदार नोंदणी असल्याने दिवाळीत त्या बाबत अधिकाअधिक जनजागृती करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. दिवाळीत प्रत्येक घरात आकाशकंदील व रांगोळी काढली जाते. याचाच फायदा घेत त्यातून मतदार नोंदणीचे महत्व पटवून देण्यासाठी या अनोख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र स्पर्धेत भाग घेणाऱयांनी आपल्या आकाशकंदिलात तसेच रांगोळीत डाव्या हाताचे अंगठय़ाच्या बाजूने शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन आदीच्या प्रतिकृतीचा वापर तसेच मतदार नोंदणी, नाव कमी करणे, मतदारांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र याचा तपशील अचूक आहे की नाही, हे मतदार यादीत पहावे, चुकीच्या तपशिलांत दुरूस्त्या कराव्यात यासाठी मतदारांना आवाहन करणारे घोषवाक्य असणे आवश्यक आहे.
या स्पर्धा खुल्या असून आकाशकंदील तयार करताना पर्यावरणपुरक साहित्य वापरणे आवश्यक आहे. वरील पध्दतीने जनजागृतीचे संदेश देणाऱया कंदिलाचे विविध कोनातून काढलेले 3 फोटो, जास्तीत-जास्त 5 एमबीचा व जेपीजी, आकाशकंदिल टांगल्याची कमीत-कमी 30 सेकंदाची तर जास्तीत-जास्त एक मिनिटाची चित्रफित तर रांगोळीचे विविध कोनातून काढलेले 3 फोटो 15 नोव्हेंबरपर्यंत https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाठवणे आवश्यक आहे. दोन्ही स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकास प्रत्येकी अनुक्रमे 11 हजार रूपये, 7 हजार रूपये, 5 हजार रूपये तर उत्तेजनार्थ 1 हजार रूपयांची 10 बक्षिसे, प्रमाणपत्र व मानचिन्ह दिली जाणार आहेत. तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (8669058325) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी पत्रकाव्दारे केले आहे.