रोड शो, पदयात्रा, मोठय़ा जाहीर सभा बंद करण्याचा आदेश
पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांसाठी निवडणूक आयोगाने अत्याधिक कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार कोणत्याही पक्षाला अगर उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा रोड शो किंवा पदयात्रा काढता येणार नाही. तसेच कोणत्याही जाहीर सभेत 500 पेक्षा अधिक लोक उपस्थित राखता येणार नाहीत. या 500 लोकांनाही एकत्र बसता येणार नाही. त्यांना सामाजिक अंतराचा नियम कसोशीने पाळावाच लागेल. सर्व जाहीर सभांवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने निरीक्षकांची नियुक्ती केली असून नियमभंग झाल्यास उमेदवाराला जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी सभा व रोड शो रद्द केले आहेत.
सर्व पक्ष व उमेदवार यांनी कोरोनापासून लोकांचे संरक्षण या बाबीला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत कोणताही निवडणूक प्रचार जाहीर कार्यक्रम होता कामा नये. यात सभा, कोपरा सभा तसेच छोटे कार्यक्रम यांचाही समावेश आहे. मतदानाच्या दिवसाआधी 72 प्रचार थांबविण्याचा आधी घेतलेला निर्णयही या दोन टप्प्यांना लागू आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे
राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारावेळी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे बंधन असूनही सरळ उल्लंघन सुरू आहे. निवडणूक आयोगाचे काम केवळ पत्रके किंवा नोटिसा काढणे हे नाही तर आपल्या आदेशांची अंमलबजावणी सक्तीने करून घेण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाने बजावला पाहिजे, असे ताशेरे कलकत्ता उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना ओढले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्बंध अधिक कठोर केले आहेत.