नागपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने विधानसभा पोटनिवडणूक घेतली होती. या निवडणुकीनंतर राज्यात कोरोना रुग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोरोना काळात निवडणूक घेण्यावरुन निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच या निवडणुकांमुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला तर याला सर्वस्वी निवडणूक आयोगाला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. याशिवाय राज्य सरकार निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी मनुष्यबळ देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. या विरोधात निवडणूक आयोगाला काय करायचं ते करावं, असंही आव्हान त्यांनी दिलं.
“कोरोना वाढल्यास निवडणूक आयोगावर गुन्हे दाखल करा”
विजय वडेट्टीवार म्हणाले, “कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्य सरकार निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाला काय करायचं ते करा. कुठुन आणणार मणुष्यबळ, युपीवरुन का? काय होईल ते होऊ द्या, तुरुंगात गेलो तर जमानत घ्यायला या. निवडणुका झाल्या, कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे.”