निवडणूक आयुक्तांची विनंती- उच्च न्यायालयाच्या टिप्पणीमुळे नाराज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीमुळे दुखावले गेलेले निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एका प्रतिज्ञापत्रात मला शिक्षा द्या, पण लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगाला संशयापासून मुक्ती मिळवून द्या असे म्हटले हेते. हे प्रतिज्ञापत्र मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात मांडण्याची त्यांची योजना होती, पण काही कारणास्तव ते मांडता आलेले नाही.
महामारीमुळे अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काही टप्प्यांना स्थगित करण्याचा विचार केला होता, पण तो टाळण्यात आला. कोरोनामुळे निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांना स्थगित केल्यास राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली असते. अशा स्थितीत राजकीय पक्ष परस्परांवर आरोप करत राहिले असते. लोकशाहीच्या रक्षणासाठी संस्थेबाबत उपस्थित शंका दूर केल्या जाव्यात. अन्यथा आरोप करण्याचे प्रचलन सुरू होण्याची भीती असल्याचे कुमार यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
मद्रास उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी ही तोंडी होती आणि आदेशाचा हिस्सा नव्हती असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांवर हत्येचा खटला चालविण्याशी संबंधित तोंडी टिप्पणी चुकीची असल्याचेही नमूद केले होते.