स्वतःच्या निर्णयांना प्रसिद्धी कशी दिली जाते याची माहिती घेण्यासाठी प्रथमच अशी योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या चार महिन्यांमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय पक्षांच्या दृष्टीनेच नव्हे तर निवडणूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने निवडणूक आयोगासाठीही या निवडणुका महत्वाच्या आहेत. निवडणूक काळात निवडणूक आयोग अनेक निर्णय घेत असतो. तसेच अनेक पत्रकार परिषदा त्याच्याकडून घेतल्या जातात आणि अनेक वक्तव्येही प्रसिद्धीस दिली जातात. या सर्व आशयाला वृत्तपत्रे, सोशल मिडिया, वृत्तमिडिया आणि वृत्तवाहिन्या यांच्याकडून कशी प्रसिद्धी दिली जाते, याची पडताळणी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून ही माहिती पुरविण्याचे उत्तरदायिक्तव खासगी संस्थेकडे दिले जाणार आहे.
निवडणूक आयोगाकडून खासगी संस्थेचे साहाय्य घेण्याचे हे धोरण भारताच्या इतिहासात प्रथमच लागू होत आहे. यांसंबंधी एक प्रस्तावविनंती सूचना आणि प्रसारण विभागाच्या वतीने प्रसारित करण्यात आली असून पात्र खासगी संस्थांना त्यानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांची बोली लावावी लागणार आहे.
कोणते उत्तरदायित्व असेल
निवडणूक आयोगाने या कामासाठी निवडलेल्या खासगी संस्थेवर महत्वाचे उत्तरदायित्व सोपविण्यात येईल. विविध महत्वाची वृत्तपत्रे, मिडिया, वृत्त वाहिन्या, विदेशी वृत्तवाहिन्या किंवा विदेशी वृत्तपत्रे आणि माध्यमे निवडणूक आयोगाच्या वृत्तांना कशी आणि किती प्रमाणात प्रसिद्धी देतात, तसेच आयोगाकडून हाती घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया आणि घेतलेले निर्णय यांवर ही माध्यमे कशा प्रकारे व्यक्त होतात, कोणती मते अथवा प्रतिक्रिया व्यक्त करतात, यासंबंधी माहिती या संस्थेने दिवडणूक आयोगाला द्यायची आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
संवाद स्थळाचे उत्तरदायित्व
याशिवाय या संस्थेने एक मध्यवर्ती संवाद स्थळ (इंटरऍक्विव्ह डॅशबोर्ड) स्थापन करायचा आहे. या स्थळाच्या माध्यमातून निवडणूक आयोगासंबंधीची सर्व वृत्ते अपलोड करणे शक्य होईल आणि त्यांची माहिती आयोगाला सातत्याने मिळत राहील अशी व्यवस्था या संस्थेने करायची आहे.
आवश्यकता काय आहे
निवडणूक आयोगाला अशा संस्थेची आवश्यकता का भासत आहे, याची माहितीही सूत्रांनी दिली. गेल्या काही दशकांमध्ये निवडणूक आयोगावर सातत्याने टीका केली जात आहे. आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणांमध्ये आयोग वेळेवर आणि कठोर कारवाई करत नाही, असा आक्षेप अनेकांकडून घेण्यात येतो. निवडणूक प्रक्रियासंबंधी ढिलाई दाखविल्याचे आरोपही केले जातात. हे आक्षेप आणि आरोप यांची तातडीने दखल घेणे आवश्यक असते. त्यामुळे निवडणूक आयोगाला स्वतःची अशी यंत्रणा असावी असे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे खासगी संस्थेकडे उत्तरदायित्व सोपविण्याचा निर्णय झाला आहे.
संस्था कसे काम करणार ?
- महत्वाची वृत्तपत्रे, राष्ट्रीय आणि स्थानिक वृत्तपत्रे व मिडिया आणि वृत्तवाहिन्या यांच्यात निवडणूक आयोगासंबंधी येणाऱया वृत्तांचे संकलन करणे
- या वृत्तांची छाननी करणे, वर्गीकरण करणे, निवडणूक प्रक्रियेसंबंधीची वृत्तेही संकलित करणे, त्यांचा अहवाल तयार करणे आणि आयोगाला तो पाठविणे
- संवाद स्थळाच्या माध्यमातून ही वृत्ते आणि इतर आशय अपलोड करुन तो निवडणूक आयोगाला सातत्याने मिळत राहील अशी योग्य व्यवस्था कारणे
- ऑन लाईन न्यूज पोर्टल्स, सोशल मिडिया, नियतकालिके, आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यमे आणि नियतकालिके यांनी प्रसिद्ध केलेली वृत्ते आयोगाला कळविणे
- आक्षेपाचे मुद्दे, टिकेचे विषय यांची माहिती व लेखकांची नावे यांची नोंद करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि अहवाल निवडणूक आयोगाला पाठविणे