पंढरपूर/ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची सातारातील पावसातील सभा उभ्या महाराष्ट्राने डोक्य़ावर घेतली. त्यांच्या याच सभेचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही असा टोला पंढरपुरातील सभेत लगावला. तसेच मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपुरात होते. यावेळी त्यांनी एकूण सहा सभा घेतल्या.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सगळ्या घटकांवर अन्याय करणारे हे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारचे १०० अपराध भरले आहेत. १०० अपराधानंतर पहिली संधी पंढरपूरच्या जनतेला मिळाली आहे. या निवडणुकीत यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा. त्याची चिंता तुम्ही करु नका, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यासोबतच शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसाच्या सभेचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला खासदार निंबाळकर यांनी आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे असं सांगितलं. आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो ही निवडणूक एका मतदारसंघाची निवडणूक असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे.