सरकार स्थापनेसाठी काँग्रेस गतीमान : भाजपविरोधी पक्षांशी युतीची तयारी
प्रतिनिधी /पणजी
गोवा विधानसभा निवडणूक 2022 च्या येत्या गुरुवारी दि. 10 मार्च रोजी होणार असलेल्या निकालाचे ‘काऊंट डाऊन’ सुरु झाले असून काँगेस पक्षाने राजकीय हालचाली गतीमान केल्या आहेत. पक्षाचे गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव हे दोघेजण गोव्यात आले असून भाजपविरोधी कोणत्याही पक्षाशी सरकार स्थापनेसाठी युती करण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने जाहीरपणे मांडला आहे. त्याला आता कोणते पक्ष, अपक्ष प्रतिसाद देतात ते 10 मार्चला निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
मगोप, आप, तृणमूल काँग्रेस तसेच काही अपक्ष उमेदवारांशी व पक्षीय नेत्यांशी त्यांनी संपर्क साधला असून काँग्रेससोबत येण्याची गळ घातली आहे. मागील विधानसभा निवडणूक 2017 च्या निकालानंतर हातातोंडाशी असलेली सत्ता गमवावी लागल्यामुळे या 2022 च्या निकालानंतर पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस पक्ष सावध व सतर्क झाला आहे.
अवघ्या मिनिटांतच नेता निवडणार
भाजप विरोधी कोणत्याही पक्षाशी व अपक्ष उमेदवाराशी युती करण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दाखविली असून त्या पक्षांना, अपक्षांना सरकारमध्ये स्थान देण्याची ग्वाही त्या दोन्ही नेत्यांनी दिली आहे. निकाल लागल्यानंतर काही मिनिटातच काँग्रेस पक्ष विधीमंडळ गटाचा नेता निवडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजप सोडून इतर सर्व पक्षीय – अपक्ष उमेदवारांशी या दोन्ही नेत्यांनी बोलणी सुरु केली आहे.
सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा चंग
या विधानसभा निवडणुकीत निकालानंतर काहीही करुन सत्ता मिळवायची असा चंग काँग्रेस पक्षाने बांधला असून त्याची पूर्वतयारी करण्यात येत आहे. निकाल लागल्यावर 21 जागा मिळाल्या तर स्वबळावर सरकार करता येईल परंतु त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर 21 हा जादुई आकडा गाठण्यासाठी काँग्रेस पक्षाने सर्व सज्जता करुन ठेवली आहे.
भाजपच्या अगोदर करणार दावा
निकालाच्या दिवशीच संध्याकाळी किंवा रात्री राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरविले असून भाजपच्या अगोदर काँग्रेसचा दावा राज्यपालांसमोर झाला पाहिजे, अशी सूचना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांना केली आहे.
मतमोजणीच्यावेळी अटीतटीची झुंज पाहायला मिळणार अशी अपेक्षा असून त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी देखील दोन पक्षात लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. कोणता पक्ष सत्तेवर येणार? कोणाचे सरकार होणार? मुख्यमंत्री कोण? याबाबत जनतेमध्ये उत्सुकता असून त्यांची उत्तरे 10 मार्चला मिळणार आहेत.