ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी निवडणूक आयोगाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार प्रचार सभा आणि वाहन रॅलींवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने आयोगाने काही प्रमाणात नियमांमध्ये शिथिलता दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या उमेदवारासोबत सुरक्षा कर्मचारी वगळून आता 10 ऐवजी 20 लोक सहभागी होऊ शकतील. मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदारसंघात जास्तीत जास्त 1000 लोकांच्या सार्वजनिक सभांना परवानगी असेल. पूर्वी केवळ 500 लोकांना परवानगी होती. इनडोअर प्रचार सभांसाठी लोकांची क्षमताही 300 वरून 500 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांना कोरोनाच्या अनुषंगाने नियमावलीचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय निवडणुकीशी संबंधित कामांमध्ये आचारसंहितेनुसार कार्यवाही करण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत.