तीनवेळा नगरसेविकेसह अनेक इच्छुकांना बसला फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड पुनर्रचना झाल्यानंतर वॉर्डनिहाय मतदारयादी तयार करण्यात आली आहे. मात्र मतदारयादीतून नावे गहाळ झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मतदारयादीतून तीनवेळा निवडून आलेल्या माजी नगरसेविकेचे नाव गहाळ झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे नाव गहाळ होण्यामागचे राजकरण काय? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
महापालिका वॉर्ड पुनर्रचना 2018 मध्ये करण्यात आली. तसेच वॉर्डनिहाय मतदारयाद्या तयार करण्यात आल्या. मात्र वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाबाबत तक्रारी झाल्याने न्यायालयीन वाद निर्माण झाला होता. अशातच कोरोनाकाळात मतदारयादी नव्याने करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला केली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 2018 मध्ये तयार केलेल्या यादीच्या आधारे नवीन मतदारयादी तयार केली आहे. वास्तविक पाहता घरोघरी जावून मतदारांची चाचपणी करून मतदारयादी तयार करणे आवश्यक होते. मात्र कोरोनामुळे घरोघरी चाचपणी न करताच मतदारयादी तयार केल्याने गेंधळ निर्माण झाला आहे.
मतदारयादीमधील असंख्य नावे गहाळ झाली आहेत. काही नावे चुकीची असून मतदारयादीतील फोटोदेखील गायब आहेत. तर काही वॉर्डांतील मतदारयादीमध्ये मतदारांची छायाचित्रे आहेत, पण नावे नाहीत, असे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे मतदारयादीबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांची नावे मतदारयादीतून गहाळ झाल्याचा प्रकारही निदर्शनास आला आहे. वॉर्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक जणांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालविली होती. पण मतदारयादीमधूनच नाव गायब झाल्याचे चव्हाटय़ावर आले आहे. यामध्ये काही युवा कार्यकर्ते तसेच सतत सामाजिक कार्य करून चर्चेत असलेल्या महिला व युवकांची नावे गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यापूर्वी तीनवेळा नगरसेविका आणि त्यांचे पतीदेव एकवेळ नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून आले होते. राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून सतत कार्यरत असणाऱया माजी नगरसेविकेचे नाव मतदारयादीतून गहाळ झाले आहे. शिवबसवनगरचा भाग असलेल्या वॉर्ड क्रमांक 26 मधून निवडणूक लढविण्यास माजी नगरसेविका इच्छुक होत्या. पण मतदारयादीत नाव नसल्याने निवडणूक लढविण्याचा बेत रद्द करावा लागला. मात्र मतदारयादीतून नाव गहाळ झाल्याने याबाबत महापालिकेसह जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली आहे.
मृत्यू झालेल्या आणि घर सोडून परगावी गेलेल्या नागरिकांची नावे अद्यापही मतदारयादीत आहेत. पण तीनवेळा निवडणूक लढवून नगरसेविका म्हणून काम करूनही मतदारयादीत नाव नाही. जाणीवपूर्वक मतदारयादीतून नाव गहाळ करण्यात आल्याची तक्रार माजी नगरसेविकेने केली आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.