मगो पक्षाचे निवडणूक आयोगाला आवाहन : आठ दिवसात मगोप-तृणमूल जागा वाटप
प्रतिनिधी /पणजी
देशभरासह राज्यातही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर प्रचारावर मर्यादा घालाव्यात, कोणतीही जाहीरसभा 100 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत घेण्यावर बंदी घालावी, अशी मागणी मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नववर्षाच्या पहिल्या आठवडय़ात मगोप-तृणमूल जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे. त्यासंबंधी पुढील सात-आठ दिवसात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. मात्र मतदारांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही पक्षाला यश मिळू शकत नाही. त्यामुळे या युतील मतदारांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.
भाजपसारखे उमेदवार चोरणार नाही
भाजपकडे सध्या लायक उमेदवार नसल्यामुळे ते इतर पक्षांचे आमदार आणि उमेदवार पळवतात. यावरून त्या पक्षाचीही पात्रता सिद्ध होते. याऊलट मगो पक्ष नवनेतृत्व तयार करण्यावर विश्वास ठेवतो. भाजपने आमचे उमेदवार पळवले तर आम्ही लगेच नवा उमेदवार तयार करू, पण भाजपप्रमाणे अन्य पक्षांचे उमेदवार चोरून आणणार नाही, असे ढवळीकर म्हणाले.
गद्दारांना मगोमध्ये कधीच स्थान नाही
एकदा पक्ष सोडून गेलेल्या कोणत्याही व्यक्तीस मग तो आमदार असो वा उमेदवार, त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात येणार नाही. गद्दारांना मगोमध्ये कधीच स्थान असणार नाही. आम्ही आमसभेत तसा ठरावच घेतला आहे, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
खाण डंप निर्यातीत मोठा घोटाळा?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील खनिज डंपची निर्यात करण्यास मान्यता दिली असली तरी यात मोठा घोटाळा असल्याचा दावा ढवळीकर यांनी केला आहे. किंबहुना हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. वारंवार आश्वासने देऊनही हे सरकार खाणी सुरू करू शकलेले नाही. त्यामुळे आता डंपची आशा दाखवून लोकांना फसविण्याचे कारस्थान मुख्यमंत्र्यांनी रचले आहे. म्हणुनच हा डंप केवळ 10 ते 20 दशलक्ष टन एवढाच असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. सदर डंप 100 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
या सरकारने लोकांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. जुलै महिन्यात आलेल्या पुरात घरे कोसळल्याने बेघर झालेल्या लोकांना अद्याप घरे बांधून दिलेली नाहीत. दहा हजार नोकऱयांची दिलेली हमी हे तर फसवेगिरीचे उत्तम उदाहरण आहे. अशावेळी आता निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी हे सरकार आणखी किती खोटी आश्वासने देणार आहे? असा सवाल ढवळीकर यांनी उपस्थित केला.
एक ’प्रवीण’ गेला, दुसरा येतोय!
मगोतून एक प्रवीण गेला म्हणून काय झाले, दुसरा प्रवीण (झांटय़े) मगोत येण्यास इच्छूक आहे. मयेतील आमचा उमेदवार भाजपने पळवला आहे. तेव्हापासून झांटय़े आमच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर अन्य कित्येक मतदारसंघातूनही भाजपचे जुने-जाणते, दूरावलेले, दुखावलेले, नेते आपल्या संपर्कात आहेत. त्यांच्यासंबंधी योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.