नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :
माजी भारतीय लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी निवड समिती अध्यक्षपदासाठी तर माजी ऑफस्पिनर राजेश चौहान व माजी डावखुरा फलंदाज अमेय खुरासिया यांनी राष्ट्रीय निवड समिती सदस्यपदासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवार दि. 24 पर्यंत निवड समिती सदस्यत्वासाठी इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत.
एमएसके प्रसाद (दक्षिण विभाग), गगन खोडा (मध्य विभाग) यांच्या जागी नवे सदस्य नियुक्त केले जाणार असून शरणदीप सिंग (उत्तर विभाग), जतीन परांजपे (पश्चिम विभाग) व देवांग गांधी (पूर्व विभाग) यांचा अद्याप एक हंगाम बाकी आहे.
भारताने बेन्सन अँड हेजिस चषक स्पर्धा जिंकली, त्यात हिरो ठरलेले शिवरामकृष्णन मागील 20 वर्षांपासून समालोचन करत आले आहेत. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी त्यांनी फिरकी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. याशिवाय, ते आयसीसी क्रिकेट समितीचे सदस्य आहेत. कनिष्ठ निवड समितीचे माजी अध्यक्ष वेंकटेश प्रसाद, माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर हे देखील निवड समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत असून या दोघांनीही अर्ज दाखल केल्यास शिवरामकृष्णन व या उभयतात चुरस असेल.
54 वर्षीय शिवरामकृष्णन यांनी 9 कसोटी व 16 वनडे (25 आंतरराष्ट्रीय सामने) तर बांगर यांनी 12 कसोटी व 15 वनडे (27 आंतरराष्ट्रीय सामने) खेळले आहेत. वेंकटेश प्रसादनी 33 कसोटी व 161 वनडे सामने खेळले आहेत. पण, कनिष्ठ निवड समिती अध्यक्ष या नात्याने अडीच वर्षे यापूर्वीच काम पाहिले असल्याने येथे निवड झाल्यास त्यांना दीड वर्षाचाच कालावधी मिळेल. 21 कसोटी व 35 वनडे सामने खेळलेल्या राजेश चौहान यांनी दुसऱया प्रयत्नात आपल्याला सुदैवाची साथ मिळेल, अशी अपेक्षा येथे व्यक्त केली.