नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी जलद गोलंदाज अजित आगरकरने देखील निवड समिती अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला असून यामुळे या निवडणुकीत विशेष चुरस निर्माण झाली आहे. अजित आगरकर मुंबई वरिष्ठ निवड समितीचा अध्यक्ष राहिला असून अध्यक्षपदाच्या खुर्चीला झोनल कोटा नसल्याने आगरकरचा मार्ग खुला आहे. आगरकर व शिवरामकृष्णन यांच्यात आता अध्यक्षपदासाठी रस्सीखेच रंगू शकते, असे प्रथमदर्शनी संकेत आहेत.
शुक्रवारी नामांकन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी अजित आगरकरने आपला अर्ज मंडळाकडे दाखल केला. 42 वर्षीय आगरकरला 26 कसोटी, 191 वनडे व टी-20 सामन्यांचा अनुभव असून यात त्याने एकत्रित 349 बळी घेतले आहेत.
भारतीय संघातर्फे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे (334 बळी), जवागल श्रीनाथ (315 बळी) यांच्यानंतर अनिल कुंबळे (288 बळी) तिसऱया स्थानी विराजमान आहे. तत्कालीन कालावधीत सर्वात जलद गोलंदाजांपैकी एक असलेल्या अजित आगरकरने कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात 23 सामन्यातच 50 बळींचा सर्वात जलद टप्पा सर केला होता.
‘अजित आगरकरने अर्ज दाखल केल्यानंतर खऱया अर्थाने या निवडणुकीत रंगत आली आहे. कारण, त्याने रिंगणात उडी घेण्यापूर्वी सखोल विचार केलेला असणार आहे. यापूर्वी, शिवरामकृष्णननी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची निवड ज्यांनी गृहित धरली असेल त्यांनी आता फेरविचार करावा. छाननीत कोणते अर्ज शिल्लक राहतात, हे औत्सुक्याचे असेल’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.
पश्चिम विभागीय सदस्य जतिन परांजपे यांचा वर्षभराचा कालावधी बाकी असून या पार्श्वभूमीवर अजित आगरकरला सल्लागार समितीची पसंती मिळाल्यास बीसीसीआय एकाच वेळी मुंबईच्या दोन सदस्यांना त्यात सामावून घेणार का, हे देखील रंजक असेल. बीसीसीआयमधील सूत्राने आगरकरसाठी हा अडचणीचा मुद्दा ठरणार नाही, असे याप्रसंगी नमूद केले. आगरकर व शिवरामकृष्णन यांच्याशिवाय, नयन मोंगिया, चेतन शर्मा, राजेश चौहान हे मुख्य चेहरेही निवड समितीतील विविध जागांसाठी रिंगणार आहेत.
अर्ज दाखल करणारे महत्त्वाचे माजी खेळाडू
अजित आगरकर (मुंबई), चेतन शर्मा (हरियाणा), नयन मोंगिया (बडोदा), लक्ष्मण शिवरामकृष्णन (तामिळनाडू), राजेश चौहान, अमेय खुरासिया (दोघेही मध्य प्रदेश), ज्ञानेंद्र पांडे (उत्तर प्रदेश). प्रीतम गंधे (विदर्भ). यापैकी ज्ञानेंद्र पांडे व प्रीतम गंधे कनिष्ठ समितीवर 4 वर्षे कार्यरत राहिल्याने या निवडणुकीसाठी अपात्र.