वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्याकरिता घेतल्या जाणाऱया निवड समिती सदस्यांच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण केले जावे, असे वैयक्तिक मत बंगालचा माजी कर्णधार मनोज तिवारीने व्यक्त केले आहे.
मनोज तिवारीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 12 वनडे आणि तीन टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारतीय संघाची निवड करताना सध्या निवड समितीची बैठक बंद खोलीमध्ये घेतली जाते. संघ निवडताना निवड समिती सदस्य कोणत्या निकषावर खेळाडूंची निवड करतात, याची माहिती प्रत्येकाला उपलब्ध होवू शकेल. संघ निवडीची प्रक्रिया पारदर्शक असते किंवा नाही याची कल्पना येवू शकेल. त्याचप्रमाणे कोणत्याही क्रिकेटपटूला आपल्याला संघात का स्थान मिळू शकले नाही याची कल्पनादेखील येईल. बऱयाचवेळा क्रिकेटपटू आपल्याला राष्ट्रीय संघात स्थान न मिळाल्याबदल निवड सदस्यांना त्याची कारणे विचारतात. बरेच क्रिकेटपटू निवड सदस्यांना दोष देतात. या सर्व शंकाकुशंका टाळण्यासाठी संघ निवडीवेळी बोलाविण्यात आलेल्या बैठकीतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे, असे मनोज तिवारीने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
देशात होणाऱया आयपीएल स्पर्धेमुळे विदेशी क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत अधिक लाभ होत असल्याचे 34 वर्षीय तिवारीने म्हटले आहे. आयपीएल स्पर्धेत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी भारतीय फलंदाजांना प्रयत्न करणे जरूरीचे आहे. विदेशी क्रिकेटपटूंच्या विरोधात आपण नसल्याचे स्पष्टीकरण तिवारीने दिले आहे. आयपीएल स्पर्धेत सहभागी होणाऱया बऱयाच संघातील पहिल्या चार फलंदाजांमध्ये विदेशी क्रिकेटपटूंना अधिक संधी दिली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मुरली विजय, करूण नायर, श्रेयस अय्यर यांना अनेकदा वगळण्यात आले आहे. पण या निर्णयासंदर्भात त्यांच्याशी संपर्कही साधला जात नाही, असेही तिवारीने म्हटले आहे.