मासे लिलावावेळी विक्रेते-नागरिकांची होतेय गर्दी : परिसरातील गावांना धोका उद्भवण्याची भीती
प्रतिनिधी / म्हापण:
कोरोनाचे संकट सुरू असताना निवती-मेढा समुद्र किनाऱयावर माशांच्या लिलावावेळी शासनाचे नियम पाळले जात नाहीत. यात शिरोडा, वेंगुर्ले, कुडाळसह बाहेरचे विक्रेते मासे खरेदीसाठी येतात. तेही मास्क व अन्य सुरक्षिततेचे नियम पाळत नसल्याने निवती परिसरातील गावांना धोका उद्भवण्याची भीती निवती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मासे खरेदी करण्यासाठी बाहेरचे व्यापारी बोलावू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेत सोशल डिस्टन्सिंग व मास्क लावण्याचा नियम पाळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मासेमारीला शासनाने परवानगी दिल्याने निवती समुद्रात स्थानिक मच्छीमार मासेमारीसाठी जातात. लिलावाच्या ठिकाणी चौकोन करण्यात आले. मात्र, होडय़ा आल्यावर सर्वच मच्छीमार लिलावासाठी गर्दी करतात. बरेचजण मास्कही लावत नाहीत. लिलाव करणारे व घेणाऱयांचीही मोठी गर्दी यावेळी होते. सरपंच भारती धुरी व सहकारी लोकांना गर्दी करू नका, असे सांगतात. मात्र, तेही मच्छीमार व जमा होणारे लोक मनावर घेत नाहीत.
बाहेरुन येतात व्यापारी, धोका उद्भवण्याची भीती
निवती किनाऱयावर मासे चांगले मिळत असल्याने शिरोडा, वेंगुर्ले, कुडाळसह बाहेरच्या भागातील व्यापारी तेथे लिलावास येतात. सध्या कोरोनाचे संकट असून संचारबंदी असताना हे व्यापारी बिनबोभाट सर्व नियम तोडून येतात. अनेकजण मोटारसायकलवर टब बांधूनही येतात. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष होत आहे. यातून कोणी बाधित आला, तर त्याचा परिणाम निवतीसह परिसरातील ग्रामस्थांना भोगावा लागणार आहे. बाहेरील खरेदीदारांना न बोलावता स्थानिकांनी चर्चा करून मासे खरेदी करावी. जेणेकरून धोका उद्भवणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बाहेरील व्यापाऱयांना निवतीत येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे. काही मच्छीमारच बाहेरील व्यापाऱयांना बोलावत असून ग्रा. पं. व पोलीस यंत्रणेने तात्काळ बाहेरच्या लोकांवर नियंत्रण आणावे. अन्यथा ग्रामस्थांनाच या विरोधात उभे राहवे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.