सरकारी नोकरीतून निवृत्त झालो. त्याला नेमकी दहा वर्षे लोटली. मागे वळून बघताना काही गोष्टींची मजा वाटते. मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाची अखेर. पण ही वर्षअखेर एकतीस मार्चला संपत नसे. एकतीस मार्चनंतर संपूर्ण वर्षाचा ताळेबंद ऊर्फ ट्रायल बॅलन्स तयार करणे, तो वरच्या कचेरीला सादर करणे, त्यांनी तो तपासून मंजूर करणे हे खूप मोठे सव्यापसव्य असे. मार्च महिना सुरू झाल्यावर त्याचा मानसिक तणाव जाणवू लागे. संगणक येण्याआधी ही कामे हाताने करताना शिसपेन्सिल, टोक करण्याचे यंत्र, खोडरबर, कॅलक्मयुलेटर ही आयुधे सज्ज केली जात. अंकगणितात आणि अकौंटस विषयात गती असलेल्यांना मोठा मान मिळत असे. कचेरीची वेळ संपली तरी उशिरापर्यंत थांबावे लागे. रात्र उलटली की थांबलेल्या कर्मचाऱयांच्या जेवणाची सोय करावी लागे. एवढे सगळे केले तरी चूक झाल्यावर वरि÷ांची बोलणी खावी लागतच.
2011 साली मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सुरुवातीचे काही दिवस आरामात गेले. लवकरच ‘तरुण भारत’साठी दैनंदिन सदर लिहायला सुरुवात केली आणि रोज ताजा विषय शोधण्यासाठी विविध वृत्तपत्रे, नियतकालिके चाळण्यात दिवस छान जाऊ लागले.
अचानक 2012 चा मार्च महिना उगवला. त्या वषी मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेकदा स्वप्नात मला जुनी कचेरी दिसत असे. आपण बेरजा करतोय. आपला आणि संगणकाचा हिशेब जुळत नाही. वीज गेली आहे, संगणक आणि आंतरजाल बिघडले आहे. वरि÷ ही कारणे ऐकून घ्यायला तयार नाहीत असे काहीबाही दिसे आणि मी झोपेतून जागा होई. पाणी पिऊन पुन्हा झोपी जाई.
अशीच वर्षे जात राहिली. मार्च-एप्रिल महिन्यात क्लोजिंगची दुःस्वप्ने दिसणे थांबले. त्याऐवजी लेखनासाठी नवनवे विषय सुचत राहिले. त्या विषयांसाठी विविध व्यासपीठांचा शोध घेणे हा थरारक अनुभव होता. गेल्या दहा वर्षात दर वषी किमान दोन वर्तमानपत्रांसाठी किंवा नियतकालिकांसाठी नियमित लेखन केले. पण त्या सर्वात ‘तरुण भारत’ हा अविभाज्य-नियमित घटक राहिला. आता स्वप्नात आमची जुनी कचेरी दिसत नाही. एखादा मजेदार विषय सुचतो. मी झोपेतून जागा होतो. उशाशी असलेल्या मोबाईलवर विषयाची नोंद करतो आणि झोपी जातो. सकाळी उठल्यावर तो विषय लिहायला घेतो. हे सारे श्रेय ‘तरुण भारत’चे आणि संपादकांचे. ‘तरुण भारत’ हा आता माझ्या रोजच्या अनुभूतीचा, आनंदाचा आणि कृतज्ञतेचा भागीदार बनला आहे.