कोल्हापूर / संजीव खाडे
गेल्या पाच दशकात केवळ हद्दवाढ न झाल्याने कोल्हापूर शहराच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. हद्दवाढीशिवाय कोल्हापूरचा विकास शक्य नाही. ती जर आपण केली नाही, तर पुढच्या पिढीचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे हद्दवाढीला विरोध करणाऱया नेत्यांनीही आता भविषयाचा विचार करून ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील भीती दूर करण्याचे काम करावे. निव्वळ राजकारणासाठी विरोध करू नये. सर्वांना बरोबर घेऊन कोणत्याही परिस्थिती महापालिका निवडणुकीनंतर हद्दवाढ करून घेणारच, अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी `तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट आणि रोखठोक अशी भूमिका मांडली. त्यांच्याशी झालेला संवाद असा ः
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे महत्व कसे विषद कराल ?
राजेश क्षीरसागर ः कोणत्याही शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. विकासाच्या दीर्घकालिन प्रक्रियेत हद्दवाढीला महत्व आहे. आज जग बदलत चालले आहे. शहराची, नगरांची महानगरे होत आहेत. औद्योगिकिकरणाबरोबर आयटी आणि सर्व्हिस इंडस्ट्री देखील वाढत आहे. राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नाशिक यासारखी शहरे विकासात आपल्या कोल्हापूरच्या पुढे गेली. या शहरांची हद्दवाढ झाल्याने विकास वेगाने झाला. रोजगार निर्मितीतही हद्दवाढीचे महत्व अधोरेखित झाले. आज आपल्याकडे केवळ हद्दवाढ न झाल्याने विकासावर मर्यादा आल्या आहेत. त्यातून रोजगार निर्मितीही ठप्प आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्या आपल्या मुलांना पुणे, मुंबई, बेंगळूरला नोकरीसाठी जावे लागत आहे. त्यामुळे हद्दवाढीला पर्याय नाही.
गेली अनेक वर्षे हद्दवाढीची मागणी आहे. आपण दोनवेळा आमदार होता. त्यावेळी कोणती भूमिका घेतली होती ?
राजेश क्षीरसागर ः आमदार होण्याआधीपासून मी हद्दवाढीचा समर्थक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून राज्य विधिमंडळात हद्दवाढीची मागणी करून वारंवार पाठपुरावाही केला. विधिमंडळाच्या आवारात बेमुदत उपोषणही केले. 2017 मध्ये तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारामुळे हद्दवाढीचा निर्णय दृष्टीक्षेपात आला होता. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली होती. पण ऐनवेळी काही लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने हद्दवाढ बारगळली. प्राधिकरणाचा पर्याय पुढे आला. आज हद्दवाढ नाही आणि प्राधिकारणाचे कामही बंद अशी स्थिती आहे.
कोल्हापूर महापालिका शहरात सुविधा देऊ शकत नाही. तर आम्हाला कशाला शहरात घेता, अशी ग्रामीण जनतेची भूमिका आहे. मग हद्दवाढ कशी होणार ?
राजेश क्षीरसागर ः हद्दवाढ न झाल्याने महापालिकेल्या महसूल, उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सुविधांचे म्हणाल तर विकासाच्या टप्प्यात अनेक चांगल्या सुविधा दिल्या आहेत. योजना राबविल्या आहेत. त्या पूर्ण होण्यास वेळ लागला सेल पण महापालिकेने काहीही केलेले नाही असे म्हणणे अन्यायकारक ठरेल. आज ग्रामीण भागातील जनताही शहरात आल्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सुविधांचा लाभ घेते. अनेक जण शहरात राहतात. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन हद्दवाढ करण्यास कटिबद्ध आहे.
हद्दवाढीला काँग्रेस, भाजप आणि आपल्या शिवसेनेच्या ग्रामीण भागातील आजी माजी आमदार, लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. त्यांच्या विषयी काय सांगाल ?
राजेश क्षीरसागर ः शहराबरोबर जिल्हÎाचा विकास साधायचा असेल, नव्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर हद्दवाढीला पर्याय नाही. त्यामुळे विरोध असणाऱया लोकप्रतिनिधी, नेत्यांनी ग्रामीण जनतेच्या मनातील भीती घालविण्याचे काम करावे. राजकारणासाठी विरोध करू नये, असे मला वाटते.
हद्दवाढीच्या समर्थनार्थ कृती समिती ऍक्टीव्ह झाली आहे. त्या विषयी काय सांगाल ?
राजेश क्षीरसागर ः कृती समितीची भूमिका चांगली आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या निर्णयासाठी पाठपुरावा करणे सुलभ होईल. याआधी कृती समितीच्या माध्यमातूनच कोल्हापूरचा टोल हद्दपार झाला. एलबीटी रद्द झाला. आता हद्दवाढीचे महत्व पटवून देण्यासाठी प्रबोधन करण्याचे कार्य कृती समिती सक्षमपणे करू शकते.
हद्दवाढ नेमकी कधी होईल ?
राजेश क्षीरसागर ः सध्या महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच साधारणे सहा महिन्यात हद्दवाढीचा निर्णय होईल. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विशेष बैठका घेऊन पाठपुरावा करणार आहे. हद्दवाढी महत्व पटवून देणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रस्तावित गावांपैकी 17 गावांचा समावेश अपेक्षित आहे. या गावांत लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करून निवडणूकही होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होणारच. ती करून दाखविणारच. राजकारण, पदापेक्षा कोल्हापूरच्या युवा पिढीचे भविष्य माझ्यासाठी महत्वाचे आहे.
नियोजन मंडळाच्या माध्यमातून विकास निधी देणार
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद देऊन पक्षप्रमुख, मुध्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासारख्या शिवसैनिकाचा सन्मान केला आहे. राज्याच्या विकासकामात योगदान देण्याची संधी मिळाली आहे. तीसहजार कोटींचा विकास निधी देणाऱया नियोजन मंडळासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हÎासाठीही भरघोस निधी देण्यास आपण कटिबद्ध आहे, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीत हद्दवाढीचा मुद्दा अजेंड्यावर
आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या वचननाम्यात हद्दवाढीचा मुद्दा हा मुख्य अजेंडÎवर असणार आहे. हद्दवाढ का आवश्यक आहे, हे ग्रामीण जनतेला पटवून देण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.