घटनास्थळावर भेट देत फोंडा पोलिसांची थेट कारवाई
महेश गावकर/ फोंडा
कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी सहली बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे विरंगुळा म्हणून आखण्यात येणारे बेत फसलेले आहेत. पणजी, म्हापसा, पेडणे येथील युवकांनी सद्या धिंगाणा घालण्यासाठी फोंडय़ातील निसर्गजन्य ठिकाणावर मोर्चा वळवलेला आहे. केरी फोंडा येथील भूतखांब पठारावर त्यामुळे पावसाळी आनंद लुटण्यासाठी भेट देणाऱयाची गर्दी वाढू लागली आहे. मात्र कोरानाच्याआड सुरू असलेल्या या प्रकारातून भूतखांब पठारावर एखाद्या अनैतिक प्रकार घडल्यास पोलीस यंत्रणा तपास करताना ‘डुंडते रह जायेगी’ असे भयानक वातावरण येथे भेट दिल्यानंतर दिसून येते. स्थानिकांच्या ग्रामस्थ व सरपंचाच्या तक्रारीनंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळावर भेट देत काही युवकांची झाडाझडती घेतली.
पावसाळा सुरू झाला की निसर्गप्रमीना ओढ लागते ती वर्षा सहलीची व निसर्गस्थळांना भेट देण्याची. अशावेळी बहुतेकवेळा ग्रामिण भागातील पावसाळी धबधब्यावर पावले सरकावु लागत होती यंदा मात्र कोरोनाच्या वाढत्या आलेखामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी घेऊ लागल्याने फेसाळत्या धबधब्याच्या फेरीमध्ये घट जाणवते. तरीही काही युवक कॉलेजमधील आनंद व मौजमजा, बाईकचा थरार, दंगामस्ती, बियर-सिगारेटची झिंग करण्यासाठी भूतखांब पठारावरील नायनल 66 प्रकल्पाच्या भग्नावस्थेत असलेल्या वास्तूत धिंगाणा घालण्यासाठी दाखल होत असतात.
दुधसागर नदीचा थ्रिल अनुभवतात भूतखांब पठारावर
कुळे दुधसागर धबधबा गाठण्यासाठी जसा नदी पार करून जाण्याचा दुचाकी थ्रिल पुर्वी अनुभवयाचा मिळायचा तसा थ्रिल अनुभवण्यासाठी केरी भूतखांब पठारावर असलेल्या बाईकवेडय़ा युवकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यानंतर पैलतीर गाठत बाईकचा थरार, यामध्ये बाईकवर हात सोडून चालविणे, व्हीली मारणे, एकाच जाग्यावर दुचाकी फिरवणे असे थरार करण्यात येत असल्याचे चित्र दिसते.
याच पठारावर सुमारे 20 वर्षापुर्वी नायलन 66 प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांचे आंदोलन व निलेश नाईक हुतात्माची घटनेनंतर यावर पडदा पडला. त्यानंतर ‘सेझ’ प्रकल्पामुळे सर्वत्र कुंपण उभारून परिसर सर्वासाठी प्रवेशबंद करण्यात आले त्यालाही विरोध झाल्यामुळे संपुर्ण परिसराचे निसर्ग आजही शाबूत आहे. येथील विहंगम निसर्ग बघण्यासाठी कुलुपबंद गेटच्या चोरटया मार्गाने निसर्गप्रेमीसह अनेक युवकही बाईक घेऊन दाखल होतात.
‘त्या’ भग्नावस्थेतील वास्तूचा उपयोग ओव्हरनाईटसाठीही
भग्नावस्थेत असलेल्या नायनल 66 च्या त्या वास्तूचा वापर सद्या दारू, अमलीपदार्थ व युवक-युवतीसह धिंगाणा घालण्याचे केंद्र बनलेले आहे. आजच्या आधुनिक युगात घरात राहून कंटाळलेले युवक ‘ओव्हरनाईट स्टे’ साठीही दाखल होते असून सायंकाळी गेलेली मंडळी सकाळी बाहेर पडत असल्याचा येथील स्थानिकांचा आरोप आहे.
फोंडा पालीस निरीक्षकाची घटनास्थळी भेट, युवकांची झडती
त्या अनुषंगाने वारंवार केरी सरपंच अनिशा गावडे व येथील ग्रामस्थांनी फोंडा पोलीस स्थानकात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. याची दखल घेत काल रविवारी फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी घटनास्थळावर भेट देणाऱया काही युवकांची झडती घेतली. पोलिसांची जीपगाडी बघून काहीजणांनी झुडपाआडून पळ काढला. गेटमधून निसटण्याऐवजी कुंपणाला असलेल्या चोरवाटा व भोकातून पळ काढला. यावेळी भेटलेल्या काही युवकांची सखोल चौकशी करून त्यांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. सद्या कोरोनाच्या काळात थोडी कळ सोसावी कोरोनाचा जोर ओसरल्यानंत पावसाळी सहलीचा आनंद लुटा, निर्जनस्थळावर योग्य ती काळजी घ्या जेणेकरून कोणाचा जीव जाणार नाही अन् कोणालाही जीव गमवावा लागणार नाही. कोरोना काळात स्वतःची व इतरांची काळजी घ्या असे आवाहन निरीक्षक मोहन गावडे यांनी केले.
युवकांची ऑफरोड मजा, बाईक स्टन्ट, दारू सिगारेटची मजा
केरी सावईवेरे मार्गावर असलेल्या भूतखांब देवाची घुमटीकडून सुमारे साडेतीन किमीटरवर हे निर्जनस्थळ आहे. युवकांचे टोळके दुचाकीचे स्टंन्ट करण्यासाठी दाखल होत असतात. तसेच काहीजण ऑफरोडची मजा लुटण्यासाठी दाखल होत असतात. मात्र पेडणे, म्हापसा, पणजी येथून दाखल होणारे युवक मात्र दारू, सिगरेटसह युवतीच्या घोळक्य़ासह दाखल होत असतात. रात्री अपरात्री येथून छुप्या मार्गाने दुचाकींच्या घोळक्याची कायम वर्दळ असते. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्येही भितीचे वातावरण आहे.
पोलिसांनी नजर ठेवावी, सरकारने लक्ष घालावे
कोणताही अनैतिक प्रकार घडण्याअगोदर कारवाई व्हावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. भूतखांब पठारावरील निर्जनस्थळावर मोठया प्रमाणात खडीचा साठा असून त्यावरही काही चोरटे डल्ला मारत असल्याचे निदर्शनास येते. या भागाचा एखादा रोजगारभिमुख कामाखाली विकास करून स्थानिकांना रोजगार पुरवावा. स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी भूतखांब पठारावरील रक्तरंजित इतिहासाची माहिती आहे. येथे फिल्म सिटी उभारण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यादिशेने प्रयत्नही कमी पडत आहेत. फिल्म सिटी उभारल्यास स्थानिकानाही बऱयापैकी लाभ होईल व निसर्गरम्य भूतखांब पठारांची एखाद्या चांगल्या कारणासाठी सिनेमाच्या माध्यामातून किर्ती सर्वदूर पाहचेल अशी प्रतिक्रिया शाम कोलेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.