प्रतिनिधी/ रत्नागिरी
बदलणाऱया वातावरणाचा बळीराजाला सातत्याने तडाखा बसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऐन थंडीच्या हंगामात अचानक अवकाळी पावसाने जिल्हय़ातील अनेक भागात धुमशान घातले आहे. गुरूवारी सकाळी व दुपारनंतर संगमेश्वर, गुहागरसह रत्नागिरी व लांजा तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव झाला. हवामानातील मोठे चढउतार आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा, काजू बागायतींना बसणार आहे.
गेले तीन-चार दिवस सर्वत्र दाट धुके अन् थंडीचे प्रमाण वाढले होते. मात्र जिह्यातील काही भागात बुधवारी मध्यरात्री अचानक पावसाला सुरवात झाली. गुरूवारी सकाळी व पुन्हा सायंकाळी काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने सावरण्याआधीच अवकाळीचा कोप झशल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. उन्हाळी पिकांसह मुख्य पिक असलेल्या आंबा, काजूच्या बागा यामुळे संकटात सापडल्या आहेत.
अचानक वादळीवाऱयासह आलेल्या पावसाने साऱयांचीच धावपळ उडाली. अगोदरच आंबा, काजू हंगाम निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकेलेला आहे. अशावेळी या आलेल्या अवकाळीने पुन्हा एकदा बागायतदारांनी निसर्गासमोर हात टेकले आहेत. अवकाळीने हाताशी येत असलेल्या आंबा, काजू पिकांची वाताहात उडण्याची शक्यता आहे. कैरी लागण्याची स्थिती असतानाच अवकाळीने किडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
हातातोंडाशी आलेले पिक धोक्यात
या हंगामात वारंवार होणाऱया पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने चिंता वाढलेली आहे. अगोदरच पिक कमी असताना हातातोंडाशी आलेले पिक अवकाळी हिरावून घेणार आहे. या संकटात विमा कंपन्या देखील येथील बागायतदारांना सहकार्य करण्यास राजी नाहीत. 20 ते 25 मिमी पर्जन्यमान असेल तरच नुकसानीचे विमा संरक्षण लाभेल असा निकष लावला जात आहे. त्यामुळे विमा संरक्षण असूनही त्याचा लाभ मिळू शकत नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात लोटला जाणार आहे.
– उदय करंदीकर,
आंबा बागायतदार मिरजोळे, रत्नागिरी