एकेकाळी भारतीय लोकमानसाचे जीवन परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणावर अवलंबून असल्याने आपल्या सण-उत्सवांद्वारे त्यांच्याशी अनुबंध दृढ केलेले आहेत. मान्सूनचा पाऊस जेव्हा निरोप घेण्यास सिद्ध होतो, तेव्हा कष्टाने जे मळे धान्यांनी समृद्ध झालेले असतात, भाताच्या कणसांनी सोनेरी वर्ख धारण केलेला असतो, सूर्याच्या किरणांनी आणि हवेतल्या गारव्यामुळे मानवी मनात उत्साह संचारलेला असतो. धरित्रीचा कणन्कण फुलांनी, फळांनी, धान्यांनी नटलेला असतो आणि त्यामुळे तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची उर्मी कष्टकऱयांच्या तनामनात निर्माण झालेली असते. गोवा-कोकणात त्याचप्रमाणे सहय़ाद्रीच्या घाटमाथ्यावरती शेतकऱयांचे प्राबल्य असल्याने, आपल्या मेहनतीचे जे चीज झालेले आहे, त्याला सृष्टीच्या कणाकणात वास करणाऱया दैवी शक्तीचे अधिष्ठान कारणीभूत आहे, अशी त्यांची दृढ भावना असते. त्यामुळे आश्विन शुक्ल पक्षाचा जेव्हा प्रारंभ होतो, त्यादिवशी सकाळी कष्टकरी ग्रामदेवीच्या मंदिरातल्या गर्भगृहात घटस्थापना करतात. कुंभ रुप हे धरित्रीचे प्रतिकात्मक गर्भाशय मानून, काही ठिकाणी नऊ प्रकारच्या धान्यांच्या दाण्यांना रुजत घातले जाते तर काही ठिकाणी मोसमी फुलांच्या दरदिवशी एक अशाक्रमाने नऊ माळा अर्पण केल्या जातात.
गोवा, कोकण आणि घाटमाथ्यावरच्या कृषीप्रधान अशा बऱयाच गावांत दसऱयाला ग्रामदैवतांची प्रतिकात्मक रुपे मानलेल्या तरंगांचे मेळ ढोल-ताशासारख्या चर्मवाद्यांच्या पार्श्वसंगीतावरती सीमोल्लंघनास निघतात. काही ठिकाणी शिव लग्नाचा सोहळा संपन्न होतो. कोल्हापूर जवळच्या रत्नागिरीतील जोतिबा हे दैवत बहुजन समाजातल्या बऱयाच जाती-जमातींचे कुलदैवत मानलेले आहे. लोकसंस्कृतीचे संशोधक रा. चिं. ढेरे यांच्यामते वारुळ आणि नाग या प्रतिकांच्या संदर्भातच जोतिबाचे ‘रवळनाथ’ हे पर्यायी नाव विचारात घ्यायला हवे. कारण जोतिबाची सहचारिणी यमाई ही जशी ‘रेणुका’ (रेणुमयी-पृथ्वी) आहे, तशीच रवळनाथाची सहचारिणी सांतेरी ही गोमंतक-दक्षिण कोकणात ‘भूमिका’ या अन्य नावाने सुपरिचित आहे. आंध्रमध्ये रेणुका ही वारुळ रुपात पूजिली जाते आणि गोमंतक – दक्षिण कोकण भागात सांतेरी ही रोयण-रवळ रुपात म्हणजेच वारुळ रुपातच पूजिली जाते. रवळ हे पद सांतेरीचे द्योतक असून रवळनाथ हा तिचा पती (नाथ) आहे. त्यामुळे दसऱयाच्या उत्सवात रवळनाथ आणि सांतेरी, भूमिका, माऊली, शांतादुर्गा आदी दैवतांच्या प्रतिकात्मक तरंगांची मेळामेळ म्हणजे एकमेकांशी होणारे मिलन शिवलग्न म्हणून परिचित आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या मिलनाद्वारे सृजनत्वासमोर भाविक नतमस्तक होतात. दसऱयाच्या सणातल्या विविध विधींद्वारे सृष्टीच्या रहस्याचे हे तत्त्व अधोरेखित केले जाते. दक्षिण कोकणात, गोव्यात त्याचप्रमाणे या प्रदेशांशी संलग्न असणाऱया बऱयाच घाटमाथ्यावरच्या गावांत तरंगामेळातून शिवलग्नाचा सोहळा संपन्न होतो.
लोकसंस्कृतीनुसार मराठवाडय़ातल्या उस्मानाबाद जिल्हय़ातील तुळजापूर हे शक्तीरुपिणी भवानीचेच रुप आहे. तुळजाभवानी हे देवीचे पहिले पीठ आहे. आंबेजोगाई योगेश्वरी हे दुसरे पीठ असून रेणुकाई मातापूर हे तिसरे पीठ आहे. चौथे अर्धे पीठे हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे आहे. या चारही देवता आदिमातेचीच रुपे मानली जातात. त्यापैकी तुळजापूरच्या तुळजाभवानीचे रुप हे खरेतर निसर्गाने समृद्ध होते. तुळजापूरचे जुने नाव चिंचपूर असून ज्या जागी आज देवीचे मंदिर आहे आणि बाजारपेठ आहे, तेथे संपूर्ण जागा चिंचेच्या झाडांनी व्यापलेली होती. जुन्या कागदपत्रात तुळजापूरचा उल्लेख ठाणे चिंचपूर असा होतो. पूर्वाश्रमीची तुळजाभवानी हे चिंचबनाची अधिष्ठात्री देवता म्हणून पूजिली जात होती. देवीला मातेच्या रुपात पूजणाऱया भाविकांनी पूर्वी शक्तीरुपिणीच्या मंदिरांची उभारणी वृक्षवेलींनी संपन्न अशा परिसरात केली आणि त्यामुळेच मंदिराशी संलग्न वृक्षांनासुद्धा पवित्र स्थान लाभले. महाभारतात पांडवांनी अज्ञातवासाच्या कालखंडात आपली समस्त शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती आणि दसऱयादिवशी ही शस्त्रे काढली. त्यामुळे शमी वृक्षाला पवित्र मानले जाते. सीमोल्लंघन आणि शिवलग्न असे जे सोहळे दसऱयात संपन्न होतात, त्यावेळेला कुबेराने सोन्याच्या मुद्रांचा वर्षाव वृक्षावरती केल्याकारणाने, आपटय़ाची किंवा कमलवृक्षाची पाने सोने म्हणून सदिच्छापूर्वक एकमेकांना देण्याची परंपरा रुढ आहे. आपटय़ाची त्याचप्रमाणे कलमवृक्षाची पाने पावसाळय़ानंतर आश्विनात लकाकी धारण करतात आणि त्यामुळे त्यांना सोने म्हणून लुटण्याची परंपरा आम्हाला वृक्षांशी जवळ आणते.
मानवी जीवन सुंदर करण्यात त्याच्या परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्वाचे स्थान आहे. वृक्ष-वेली, पशु-पक्षी यांचे अस्तित्व अबाधित ठेवून, आपले जगणे समृद्ध करण्यास इथल्या कष्टकरी समाजाने प्राधान्य दिले होते आणि त्यासाठी बदलत्या ऋतुमानाची दखल घेऊन, त्यांनी सण-उत्सव त्याचप्रमाणे विधी-परंपरांचे नियोजन केले. त्यांची सांगड त्यामुळे त्यांनी आपटा, कलम वृक्षांची पाने सोने म्हणून एकमेकांना अगदी सदिच्छापूर्वक भेट देण्याची परंपरा निर्माण केली. गोवा-कोकणातील माळराने आणि जंगल परिसरात वास्तव्य करणाऱया म्हशी आणि बकऱयांचे पालन करणाऱया धनगर जमातीचा दसऱयाचा उत्सव, त्यांच्या निसर्गाशी असलेल्या ऋणानुबंधांना समृद्ध करीत असतो. वैशिष्टय़पूर्ण असे पांढरे झगे, डोक्याला पागोटे घालून ढोलताशाच्या निनादात संपन्न होणारे त्यांचे गजानृत्य खरेतर म्हशीच्या हावभावांना समूर्त करीत असते. पायातल्या वाक्यांचा मिसळणारा नाद निराकार रुपात निसर्ग तत्त्वालाच म्हालची पांढरीच्या कृपाशिर्वादाला जणू काही जागृत करतो.
पशुपालक असणारी धनगर जमात दसऱयादिवशी आपल्या कुलदैवतांबरोबर पूर्वजांना जो नैवेद्य अर्पण करतात, त्यासाठी कुडा आणि चांदिवडा वृक्षाच्या पानांचा उपयोग करतात. त्यादिवशी धातूच्या पतव्याचे किंवा तिळारी नदीतील दगड-गोटय़ांच्या तांदळय़ांचे पूजन केले जाते. या देवतांनी युक्त असलेली पाटी बाहेर काढून झाडांच्या सावलीत माळावरती विधीनुसार पूजा केली जाते. तत्पूर्वी पाटीतल्या देवतांचे पूजन घरात छताला बांधलेल्या मंडपाखाली केले जाते. आश्विन महिन्यात जंगलात जी रानटी फळे-फुले उपलब्ध असतात, त्यांनी ही मंडपी सजविली जाते. धनगर जमातीचे जीवन पूर्वीच्याकाळी त्यांच्या परिसरात उपलब्ध असलेल्या जैविक संपदेच्या घटकांवरती अवलंबून असायचे. खाद्यान्न, वनौषधी म्हणून ज्या वृक्ष-वेलींचा वापर केला जायचा, त्यांना मंडपीच्या सजावटीत स्थान दिले जायचे. पुरुषांच्या मर्दानी गजानृत्याचे तर स्त्रियांच्या पारंपरिक लोकगीतांच्या सुरेल गायनावरती फुगडय़ांच्या नृत्याचे सादरीकरण केले जाते.
दसऱयाला काही ठिकाणी भाताच्या पिवळसर कणसांची पूजा करून, घराच्या प्रवेशद्वारावरती आम्रपल्लवासहित त्यांचे तोरण बांधण्याची परंपरा आहे. ‘शमी शमयते पापं’ अशा श्लोकांचे पठण करून सीमोल्लंघनाच्यावेळी पापनाशक वृक्षाचे पूजन केले जाते. आपटय़ाचा वृक्ष पवित्र मानलेला असून त्याला ‘अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण’ मंत्र म्हणून त्याची पाने सोने म्हणून देवाला अर्पण करण्याबरोबर इष्टमित्रांनाही भेट दिली जातात. दसरा हा भारत आणि नेपाळमधील विशेष महत्त्वाचा सण असून, विजयाच्या, पराक्रमाच्या स्मृती जागृत करण्याबरोबर यादिवशी होणारे पानांचे, नऊ धान्यांच्या अंकुरांचे अर्पण या उत्सवाचे मूळ कृषीस्वरुप व्यक्त करणारे आहे.
– राजेंद्र पां. केरकर