निरोग भारत नॅचरोपॅथीतर्फे उद्यापासून निसर्गोपचार शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
आयुर्वेदापूर्वीही भारतामध्ये निसर्गोपचार पद्धत अस्तित्वात आली आहे. शरीर आणि मनाच्या शुद्धिकरणासाठी ही निसर्ग उपचार पद्धत अत्यंत गुणकारी ठरणारी आहे. यासाठी निरोग भारत नॅचरोपॅथीतर्फे रविवार दि. 7 आणि सोमवार दि. 8 फेब्रुवारी असे दोन दिवस निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डेहराडूनच्या तपोवन आश्रमचे डॉ. विनोदकुमार शर्मा यांनी दिली.
शहरातील मनोप्रभा मंगल कार्यालय येथे शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. शर्मा म्हणाले, अपघातामुळे झालेल्या इजा वगळता अन्य सर्व रोगांवर निसर्गोपचार पद्धत गुणकारी ठरते. आजवर आपण अनेक रुग्णांना निसर्गोपचाराद्वारे स्वास्थ्य मिळवून दिले आहे. आज आजाराचे प्रमाण वाढत असून याचे कारण म्हणजे आपली आहार पद्धत बदलली आहे. आपले निम्म्याहून अधिक आजार हे चुकीच्या आहार पद्धतीमुळे निर्माण झालेले आहेत. जिभेचे चोचले अर्थात असंतुलन हे सर्व आजारांचे मूळ कारण आहे. यासाठीच प्राकृतिक चिकित्सेद्वारे शरीर आणि मनाचे शुद्धिकरण या शिबिरात केले जाणार आहे. निसर्गोपचार पद्धतीमध्ये योग, शुद्धिक्रिया, जलनेती, कुंजर क्रिया, मडथेरपीचा अवलंब केला जातो. माती, पाणी, हवा, आकाश, वनस्पती यांचा या उपचार पद्धतीत वापर केला जातो. असे सांगून बेळगावच्या नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. विनोदकुमार शर्मा यांनी केले.
येत्या रविवार व सोमवारी पहाटे 5.30 वाजता योग क्रियेद्वारे शिबिराला प्रारंभ होईल. दोन दिवस चालणारे हे शिबिर पूर्णतः विनामूल्य आहे, अशी माहिती साधक परमधाम यांनी दिली. मनोप्रभाचे संचालक डॉ. नितीन चौगुले, डॉ. बसवराज सुतार आदी पत्रकार परिषदप्रसंगी उपस्थित होते.