ऑनलाईन टीम / पुणे :
अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज दुपारच्या सुमारास अलिबाग किनाऱ्यावर धडक देईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ भीषण रूप धारण करणार असल्याची शक्यता असल्याने मुंबईसह पालघर किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे वादळ किनाऱयावर धडकेल, तेव्हा याचा वेग ताशी 120 किमी इतका जास्त राहणार असून, पाऊस तसेच वाऱ्यामुळे नुकसानीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी ‘निसर्ग’ या चक्रीवादळात रुपांतर झाले. ताशी 6 किमी वेगाने ते प्रवास करीत असून, बुधवारी दुपारी ते अलिबागजवळ हरिहरेश्वर व गुजरातमधील दमण या किनारपट्टीच्यादरम्यान धडकणार आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील यंत्रणा सज्ज झाल्या असून, NDRF तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंतच्या सर्व जिल्ह्यांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी. वेळप्रसंगी स्थलांतर स्थलांतर करण्याची वेळ आलीच तर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.