ऑनलाईन टीम / मुंबई :
अलिबागपासून पुढे सरकणारे निसर्ग चक्रीवादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच ते 50 किमी दक्षिणेकडे वळाले. त्यामुळे या वादळाचा मुंबईवरील थेट धोका कमी झाला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात माहिती दिली आहे.
निसर्ग चक्रीवादळ 50 किमी दक्षिणेकडे म्हणजेच मुरुडच्या दिशेने वळाले आहे. अलिबागपासून 95 किमीवर हे वादळ येऊन ठेपले आहे. त्यामुळे मुंबईवरील धोका आता कमी झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता ही सुपर सायक्लोनइतकी तीव्र नाही. मुळात हे वादळ जितक्या वेगाने तयार झाले आहे. तितक्याच वेगानं ते शमण्याची शक्यता आहे. मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळे आतापर्यंत एकही वादळ मुंबईला धडकलेले नाही, हे वादळही थेट मुंबईला धडकेल असे नाही.
चक्रीवादळ मुरुडकडे सरकल्याने मुंबई शहरावरील धोका कमी झाला असला तरी प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.