प्रतिनिधी/ बेळगाव
अरबी महासमुद्रात आलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसला आहे. यामुळे खबरदारी म्हणून कोकण रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडय़ा लोंढा, मिरज, पुणेमार्गे वळविल्या. त्यामुळे मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभरात बेळगावमार्गे या रेल्वे धावत होत्या.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया रेल्वे मडगावपर्यंत येऊन तेथून लोंढामार्गे धावत होत्या. एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन (क्र.02617) ही रेल्वे व्हाया मडगाव, लोंढा, मिरज, पुणे, दौंड, मनमाडमार्गे धावली. तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनल (06346) व दिल्ली-तिरुअनंतपुरम ही रेल्वे याचमार्गे धावली. या रेल्वे बेळगावमार्गे धावल्या असल्या तरी बेळगावच्या प्रवाशांना यामध्ये प्रवेश नव्हता.
निसर्ग वादळाचा फटका गोवा ते मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीला बसला आहे. कोकण रेल्वेचा मार्ग हा किनारपट्टीला लागूनच असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे विभागाने बेळगावमार्गे रेल्वे वळविल्या आहेत. मार्गात अचानक बदल करण्यात आल्याने अनेक प्रवाशांचे नुकसान झाले.