नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात सप्टेंबर महिन्यात नियोजित असलेल्या नीट आणि जेईई परीक्षा रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी 6 राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. परीक्षांसंदर्भात निर्णय देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तसेच प्रवासात येणाऱया अडचणींची दखल घेतली नसल्याचा दावा पुनर्विचार याचिकेत करण्यात आला आहे.
देशात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी नीट व जेईई परीक्षा सर्वांत महत्त्वाची मानली जाते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत असताना एनटीएने या परीक्षेची नवी तारीख जाहीर केली यानुसार नीट परीक्षा 12 सप्टेंबर आणि जेईई परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. पण या परीक्षांवरून सध्या राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.
नीट आणि जेईई परीक्षांसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि पाँडिचेरी या 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सात राज्यांची बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत एकमत झाले होते. त्यानुसार शुक्रवारी पाँडिचेरी वगळता इतर सहा राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.
सोनिया गांधींनी केला व्हिडिओ शेअर
याचिका दाखल करण्याबरोबरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या व्हिडिओतून देशभरातील विद्यार्थ्यांना उद्देशून आवाहन केले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांना विचारात घेऊनच घ्यायला हवा, असा सल्ला देखील सरकारला दिला आहे.