कोरोनामुळे जीवन थांबू शकत नाही : सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, याचिका फेटाळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या उद्रेकामुळे वैद्यकीय आणि अभियात्रिकी प्रवेश परीक्षा (नीट आणि जेईई) लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोरोना आहे म्हणून जीवन थांबू शकत नाही. शक्य तितके व्यवहार सुरू राहिलेच पाहिजेत, असे स्पष्ट करत या परीक्षा सप्टेंबरमध्ये पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार होतील, असा आदेश न्यायालयाने दिला. यामुळे या परीक्षा देण्यासाठी सज्ज असणाऱया विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
न्या. अरूण मिश्रा यांच्या नेतृत्वातील पीठाने हा निर्णय दिला. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याचे परिणाम यांची न्यायालयाला पूर्ण कल्पना आहे. मात्र या एका कारणासाठी विद्यार्थ्यांचे करीअर अडवले जाऊ शकत नाही. कोरोना आणखी एकादे वर्ष राहण्याची शक्यता आहे. तथापि त्यामुळे साऱयाच बाबी ठप्प केल्या जाऊ शकत नाहीत, अशी स्पष्टोक्ती पीठाने केली आहे.
आवश्यक दक्षता घेणार
या परीक्षा पुढच्या महिन्यात, अर्थात सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम आधीच ठरलेला आहे. तो बदलण्याचे काहीच कारण नाही. कोरोनाचे संकट असले तरी आता सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. ते अनिश्चित काळासाठी थांबवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या परीक्षा घेण्यासाठी अनुमती द्यावी. सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यास आणि दक्षता घेण्यास सज्ज आहे, असा युक्तीवाद प्रथम महाधिवक्ता तुषार मेहता यांनी केला. तो मान्य करत न्यायालयाने सरकारला परीक्षा ठरल्याप्रमाणे घेण्याची अनुमती दिली.
आणखी एक याचिका परीक्षा लांबणीवर टाकाव्यात या मागणी विरोधात आणखी एक याचिका सादर करण्यात आली होती. ती परीक्षा वेळेवरच घ्याव्यात अशी मागणी करणारी होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत वरील प्रमाणे आदेश दिला आहे. यामुळे नीट आणि जेईई या परीक्षा सप्टेंबरात होणार हे निश्चित झाले आहे.