ऑनलाईन टीम / मुंबई :
नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील सचिन वाझे असल्याचा गौप्यस्फोट अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मुंबईत एका आयोजित पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते. ते म्हणाले, नीरज गुंडे हा फडणवीसांचा दूत होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला मुख्यमंत्री कार्यालयात, त्यांच्या निवासस्थानात थेट प्रवेश असायचा. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे, केव्हा होणार, हे तो ठरवायचा. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर त्याचे नियंत्रण होते. त्याच्या माध्यमातून वेगवेगळय़ा प्रकारची वसुली व्हायची. समीर वानखेडे यांची बदली करण्यामागेही फडणवीस आहेत. सध्या महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी व कायदेशीर कारवाया मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या काळात गुंडे सर्व यंत्रणांच्या कार्यालयात फिरताना दिसत आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडे फडणवीसांचे निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे मांडवली करण्यासाठी जायचा. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाही गुंडे भाजपा आणि शिवसेना सोबत यावी यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, गुंडेचा उद्धव ठाकरेंशी काहीही संबंध नाही, असेही मलिक म्हणाले.