प्रत्यार्पणाच्या शक्यतेने आशा पल्लवित, पण…
पंजाब नॅशनल बँकेची सुमारे दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या फसवणुकीची फसवणूक केल्याच्या प्रकरणामुळे देशाबाहेर पळून गेलेला नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरूंगात आहे. त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रकरणात ब्रिटीश न्यायालयात भारताला यश मिळाले आहे. त्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या न्यायालयाने गुरुवारी संमती दिल्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, सद्यःस्थितीत केव्हा प्रत्यार्पण होणार याबाबत निश्चित अंदाज बांधला जात नसला तरी भारताने एक महत्त्वाची पायरी सर केलेली दिसून येते.
नीरव मोदीच्या ताब्यासाठी भारताने सुरू केलेल्या जोरदार प्रयत्नांनंतर जारी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वॉरंटनुसार ब्रिटनमधील यंत्रणांनी नीरवला अटक केली होती. त्यानंतर भारताने पुढील हालचाली सुरू केल्यानंतर नीरव मोदीने प्रत्यार्पण टाळण्यासाठी याचिका दाखल केली होती. ब्रिटीश न्यायालयाच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी नीवर मोदीकडून अनेक युक्तीवाद केले गेले. भारतात सरकारी दबाव, प्रसारमाध्यमांचा पवित्रा आणि न्यायालयांची कमकुवत स्थिती इत्यादी करणे देत त्याने प्रत्यार्पणाला विरोध केला. तथापि त्याचे प्रयत्न वाया गेले. नीरव मोदीचे भारताकडे हस्तांतरण केल्यास त्याला न्याय मिळणार नाही असे सांगणारा एकही पुरावा नसल्याचे निरीक्षण ब्रिटनच्या न्यायालयाने नोंदवले आहे. राजकीय दबाव आणि प्रसारमाध्यमांमुळे भारतात न्याय मिळणार नाही, हा नीरव मोदीचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला आहे. भारतातील राजकारणी कुठल्या सुनावणीत प्रभाव टाकत असल्याचे दिसत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
‘एलओयू’मध्ये घोटाळय़ाचे मूळ
गेली अनेक वर्षे सर्रास होत असलेल्या या पीएनबी गैरव्यवहाराचा उलगडा नीरव मोदी समूहातील कंपन्या आणि गीतांजली जेम्स यांच्यातील लागेबांध्यातून झाल्याचे दिसून येते. नीरव मोदी यांच्या तीन कंपन्या आणि गीतांजली जेम्सचे पंजाब नॅशनल बँकेच्या या शाखेत चालू खाते होते. काही भ्रष्ट बँक अधिकाऱयाच्या संगनमताने हे गैरव्यवहार चालत असे. बँकेनेच तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या काही वर्षांत अशी 150 ‘एलओयू’ घेऊन हा बँकिंगमधील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा घडला आहे. नीरव मोदीच्या घोटाळय़ाचे मूळ हे पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेतून दिली गेलेली तब्बल 150 ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू)’ अर्थात ‘अभिवचन पत्रा’तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीएनबी घोटाळय़ाचे स्वरूप…
नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्या परदेशातील कंपन्यांकडून कच्चे हिरे घेत आणि या विपेत्यांना विदेशी चलनात मोबदला द्यावा लागत असे. या कच्चे हिरे विपेत्यांची भारतीय बँकांच्या विदेशी शाखांमध्ये खाती होती. पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदी अनधिकृतरीत्या ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ मिळवून, बँकेच्या विदेश शाखेतून अल्प मुदतीचे कर्ज मिळवून विपेत्यांची रक्कम चुकती करीत असे. हे एलओयू म्हणजे कर्ज हवे असलेल्या व्यक्तीच्या योग्यतेची म्हणजे त्याने त्या बदल्यात उचललेल्या कर्जाची पंजाब नॅशनल बँकेने दिलेली हमीच होती. बँकेच्या भ्रष्ट अधिकाऱयाकडून मन मानेल तसे हे पत्र मिळविले जाई आणि त्या बदल्यात भारतीय बँकांच्या विदेश शाखेतून कर्ज उचल करून विपेत्यांना पैसे दिले जात.
‘पीएनबी’च केंद्रस्थानी…
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे, ‘एलओयू’मार्फत होणारा पतपुरवठा अल्पमुदतीचा होता आणि 90 दिवसांमध्ये त्याची परतफेड व्हायला हवी होती. तरी भारतीय बँकांच्या विदेश शाखांनीही या नियमाचा भंग करून वर्षभराच्या कालावधीसाठी हे कर्ज दिल्याचेही उघडकीस आले. अशा प्रकारे भारतीय बँकांच्या 30 विदेश शाखांना हा एकंदर 11,400 कोटींचा गंडा घातला गेला आहे. ‘एलओयू’ देणारी बँक म्हणून पंजाब नॅशनल बँकेवरच या घोटाळय़ाचे दायित्व आहे असे मत आहे.
देशाबाहेर पलायन…
अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचे कुटुंबीय बँकेला गंडा घालून 2017 साली डिसेंबर महिन्यात देशाबाहेर फरार झाला. सुरुवातीला तो स्वित्झर्लंडला रवाना झाल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यानंतर तो लंडनमध्ये दाखल झाला होता. नीरव मोदी परदेशात पळाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. नीरव मोदी यांच्यापूर्वी भारतातील बँकाना सुमारे 9 हजार कोटींचा चुना लावून विजय मल्ल्या देखील परदेशात पळाला होता. त्यापाठोपाठ आता नीरव मोदीही परदेशात पळाल्याने तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
हिरे व्यापारी ते घोटाळेबाज
आर्थिक घोटाळा करून पसार झालेला अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याला खरे तर संगीत क्षेत्रात चमकदार कामगिरी करून दाखवायची होती. म्हणूनच कदाचित मुंबईतील ऐतिहासिक ‘ऱिहदम हाऊस’ त्याने विकत घेतले होते. काळाच्या ओघात नीरवची संगीत आवड मागे पडली. मग कुटुंबाच्या परंपरागत हिरे उद्योगात त्याने उडी घेतली. नीरवचे वडीलही हिरे व्यापारीच होते. हिरे उद्योगाची राजधानी मानल्या गेलेल्या बेल्जियममधील अ?Ÿण्टवर्पमध्ये नीरवचा जन्म झाला असला तरी तो अमेरिकेतील विद्यापीठातील शिक्षण सोडून मुंबईत परतला आणि हिरे जगतामध्ये नाव कमावयाचा त्याने ध्यास घेतला. गीतांजली जेम्स ग्रुपच्या माध्यमातून चंचूप्रवेश केलेल्या नीरवने पुढे स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्धार केला. गीतांजली जेम्सचे अध्यक्ष आणि नीरवचे मामा मेहुल चोक्सी हेही पीएनबी घोटाळय़ातील आरोपी आहेत.
संपत्तीवर टाच
नीरव मोदीचे कारनामे उघड झाल्यानंतर तपासयंत्रणांनी त्याच्या संपत्तीवर कारवाई सुरू केली आहे. तसेच पीएनबीनेही याबाबत पाळेमुळे शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तावर ईडीच्या अधिकाऱयांनी छापे मारले असून कोटय़वधींची मालमत्ता जप्त केली आहे. नीरव मोदी याच्या मुंबई, सुरत आणि दिल्ली येथील खासगी मालमत्ता आणि दागिन्यांच्या दुकानावर छापे टाकून विविध मालमत्तांना सील ठोकले आहे.
कुटुंबीयांवर गुन्हे
सीबीआयने नीरव मोदी, त्यांची पत्नी, भाऊ निशाल आणि आणखी काही नातेवाईकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याबद्दल सीबीआयने ही कारवाई केली आहे. गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील कलमांतर्गत मोदी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुह्यामध्ये बँकेच्या काही अधिकाऱयांनी आपल्या पदाचा गैरवापर करत नीरव मोदीच्या कंपनीला फायदा होईल अशी कामे केली. यातून पंजाब नॅशनल बँकेला तब्बल कोटय़वधींचा तोटा झाला. यामुळे सीबीआय या घोटाळय़ात सहभागी असलेल्या बँकेच्या अधिकाऱयांची चौकशी करणार असून, ईडी यामध्ये मनी लॉंड्रींगअतंर्गत गुन्हा दाखल करीत तपास करीत आहे.
बँक अधिकारी कचाटय़ात
2017 सालापर्यंत पीएनबीत उपव्यवस्थापक पदावर काम करणाऱया गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज खरात या अधिकाऱयांनी आपल्या पदाचा गैरवापर करत 280 कोटी रुपये किमतीची 8 लेटर्स ऑफ अंडरस्टॅण्डींग्ज (एलओयू) नीरव मोदीच्या कंपनीच्या नावे जारी केली होती. आपल्या निवफत्तीला फक्त तीन महिने शिल्लक असताना शेट्टी यांनी हा प्रकार केला होता. नीरव मोदी व त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी 11,400 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची कबुली पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी केली होती. तसेच बँकेचे काही कर्मचारी या घोटाळय़ात अडकले असल्याचेही स्पष्ट करत संबंधितांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. या घोटाळय़ाशी संबंधित काही जणांची अजूनही चौकशी सुरू आहे.
गाजलेले बँक गैरव्यवहार…
पीएनबी घोटाळय़ाआधीही 1 लाख रुपयांवरील आर्थिक घोटाळय़ाच्या प्रसंगांना अनेक सरकारी तसेच खासगी बँकांना सामोरे जावे लागले होते. अर्थातच हे गैरव्यवहार संबंधित बँकांचे कर्मचारी, वरि÷ अधिकारी यांच्या मध्यस्थाद्वारे झाले. पैकी अनेक प्रकरणात थेट बँकेच्या संचालक पदावरील व्यक्तीलाही कारवाईला सामोरे जावे लागले होते. पीएनबी बँक घोटाळा केवळ देशातील बँकच नव्हे तर एकूणच आर्थिक घोटाळय़ांवर वरचढ ठरणारा आहे. भांडवली बाजाराशी संबंधित केतन पारेख (2001 ; 137 कोटी रुपये), हर्षद मेहता (1992 ; 4,999 कोटी रुपये) तसेच सत्यम कम्प्युटर्स (2009 ; 7,136 कोटी रुपये) या आर्थिक घोटाळय़ांनाही मागे टाकणारा पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा असल्याचे स्पष्ट होते.
न्यायालयाचा निकाल आलाय, पण सरकारची अनुमती अत्यावश्यक !
सद्यस्थितीत ब्रिटनच्या न्यायालयाने याचिका फेटाळत नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अनुमती दिली आहे. मात्र, ब्रिटनमधील कायद्यानुसार प्रत्यार्पणासाठी अजूनही कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे. इतकेच नाही तर ब्रिटन सरकारने प्रत्यार्पणाला परवानगी देणेही अत्यावश्यक आहे. सरकारची अनुमती मिळाली तरच प्रत्यार्पणाची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. त्यासाठी भारत आणि ब्रिटन सरकारसह दुतावास पातळीवर अधिक सक्रियपणे रणनीती ठरविण्याची आवश्यकता आहे. तसेच आता पुढील टप्प्यात नीरव मोदी ‘नीरव’पणे (‘आवाज न करता’) कशाप्रकारे लढय़ाला तोंड देतो हे पहावे लागेल.
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचीही प्रतीक्षा
नीरव मोदीला मुंबईतील विशेष न्यायालयाने फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. मद्यसम्राट विजय मल्ल्यानंतर मोदी हा दुसरा व्यावसायिक आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आला. नीरवनंतर आता विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठीही प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘नीरव कांडा’चे महत्वाचे टप्पे…
- डिसेंबर 2017 : विविध बँकांना ठेंगा दाखवत देशाबाहेर फरार
- जानेवारी 2018 : ‘पीएनबी’ची नीरवविरोधात पोलिसात धाव
- फेब्रुवारी 2018 : सीबीआयसह ईडीकडून तपास सुरू, छापे
- फेब्रुवारी 2018 : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचा पासपोर्ट रद्द
- जून 2018 : इंटरपोलकडून नीरवविरोधात रेड कॉर्नर नोटीस
- मार्च 2019 : लंडनमध्ये नीरव मोदीवर अटकेची कारवाई
- फेबुवारी 2021 : भारताकडे प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन राजी
संकलन : जयनारायण गवस